करोना संसर्गामुळे कठोर निर्बंध लागू होताच, डोंबिवलीतील रिक्षावाले पुन्हा एकदा त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चर्चेत आलेत. शहरातील रिक्षा संघटनांनी आपल्या सदस्यांना दोन प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेक महिने प्रति प्रवासी २० रुपये भाडे देऊन त्रस्त झालेले प्रवासी रिक्षा चालकांकडून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या या प्रकारामुळे हैराण झाले आहेत. असं असतानाच आता रिक्षा चालकांच्या मनमानी काराभारावर अंकुश आणण्यासाठी पोलीस पुढे सरसावले आहेत. आज म्हणजेच गुरुवारी सकाळपासूनच रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केलीय.

१०० हून अधिक रिक्षांवर कारवाई…
प्रवाशांकडून वाढीव भाडे घेणे, बेशिस्तपणे प्रवाशांशी वागणाऱ्या डोंबिवलीतील १०० हून अधिक मुजोर रिक्षा चालकावर डोंबिवली वाहतूक विभाग व उप-प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. आज पहाटेपासूनच या कारवाईला सुरुवात झाली आहे. करोना निर्बंधांच्या नावाखाली रिक्षा चालकांनी दोनच प्रवासी नेण्याची भूमिका घेत प्रवाशांची लूट चालवल्याचा आरोप केला जात असतानाच पोलिसांनी या साऱ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं चित्र दिसत आहेत.

कारवाईचे संकेत आधीच देण्यात आलेले…
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी, “रिक्षा चालकांनी तीन प्रवासी आणि ठरलेल्या शेअर दराप्रमाणे प्रवासी वाहतूक करावी. मनमानीने नियम करून कोणीही रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असेल, प्रवाशांशी वाद घालत असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल,” असं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. त्यानुसार आजपासून या प्रकरणी कारवाई सुरु झाल्याचं चित्र शहरामध्ये दिसत आहे.

निर्बंधांच्या नावाखाली प्रवाशांची लूट…
सोमवारपासूनच डोंबिवलीत एका रिक्षात दोनच प्रवासी या विषयावरून प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. गेल्या वर्षी जूनपासून रिक्षा चालकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी एका रिक्षेत दोन प्रवासी घेऊन प्रति प्रवासी २० रुपये भाडे घेण्यास सुरुवात केली होती. प्रवाशांनी २० रुपये भाडे अनेक महिने दिले. रिक्षा चालकांना एक फेरीत ४० रुपये मिळत असल्याने चालक खूष होते. करोना निर्बंध उठल्यानंतरही रिक्षा चालकांनी तीन प्रवासी आणि शेअर भाडे घ्यावे म्हणून प्रवासी प्रयत्नशील होते. त्याला रिक्षा चालक दाद देत नव्हते. दररोज चाळीस रुपये खर्च करणे शक्य नसल्याने बहुतांशी नोकरदार पायपीट करत होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शेअर भाडे लागू झाल्यापासून रिक्षा चालकांनी दोन आसन क्षमतेवर प्रवासी भाडे घेणे बंद करून तीन आसनावर प्रवासी घेऊन शेअर पद्धतीने भाडे आकारणीस सुरुवात केली होती.

पुन्हा मनमानी कारभार…
दोन दिवसापूर्वी शासनाचे कठोर निर्बंध लागू झाल्या बरोबर डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा संघटनेने सदस्यांना करोनाचा वाढता धोका विचारात घेऊन रिक्षात दोन प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना केल्या. या आदेशामुळे इतर रिक्षा संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली. डोंबिवली पूर्व, पश्चिमेत काही रिक्षा वाहनतळांवर चालक मनमानी करून दोन प्रवासी घेऊन वाहतूक करत आहेत. प्रति प्रवासी २० रुपये भाडे आकारत आहेत.

न्यायालयात जाण्याची तयारी…
डोंबिवलीतील रिक्षा चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस यांचा अंकुश नाही. रिक्षा चालकांच्या मनमानीची आपण परिवहन आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत. भाडय़ावरून नेहमीच प्रवाशांची पिळवणूक करणाऱ्या रिक्षा चालकाच्या विषयावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असं उपनगरी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षा संघटनांची भूमिका काय?
“सार्वजनिक वाहूतक ५० टक्के क्षमतेने चालवा असे शासनाचे आदेश आहेत. त्याचे पालन करण्याचे ठरवले होते. पण आरटीओ अधिकारी तीन प्रवासी घेऊन प्रवास करण्याचे सुचवत आहेत. आम्ही चालकांना कोणत्याही सूचना केल्या नाहीत. गोंधळ आरटीओ पातळीवर आहे,” असं म्हणत लाल बावटा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी भूमिका स्पष्ट केलेली.