उपनगरी रेल्वेतील गर्दीचा आणखी एक बळी गेला आहे. गर्दीमुळे रेल्वेतून तिघेजण बुधवारी मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान पडले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले.
हाजीर अहमद (५३) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. इम्तियाज शेख (४३) आणि अब्बू ओसाम (३०) हे गंभीर जखमी झाले. या दोघांवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हाजीर, इम्तियाज आणि अब्बू या तिघांनी बुधवारी सकाळी मुंब्रा रेल्वे स्थानकातून मुंबईत जाण्यासाठी उपनगरी रेल्वे पकडली. मात्र, गाडीत प्रचंड गर्दी असल्याने हे तिघे मुंब्रा-कळवा रेल्वेस्थानकादरम्यान खारेगाव फाटकाजवळ रेल्वेतून पडले. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरु असतानाच हाजीर यांचा मृत्यू झाला. इम्तियाज यांच्या डोक्याला आणि अब्बू यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे.