बदलापूरः मुसळधार पावसामुळे बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम उल्हास नदीवर असलेल्या आणि अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर झाला आहे. येथील केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी उचल आणि प्रक्रिया करण्याचे काम ठप्प झाले आहे. परिणामी सोमवारी आणि मंगळवारी होणारा पाणी पुरवठा अनियमीत आणि कमी दाबाने होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली आणि माथेरान या भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. उल्हास नदी सध्याच्या घडीला बदलापूर शहरातून धोक्याच्या पातळीजवळून वाहते आहे. याच उल्हास नदीवर बॅरेज बंधारा आहे. या बंधाऱ्यातून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना पाणी पुरवठा केला जातो.

सोमवारी सकाळपासूनच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. दुपारी दोनच्या सुमारास उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. तर धोकाची पातळी ओलंडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शहराचा विविध सखळ भागात पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे. त्याचवेळी शहरातील वीज पुरवठाही बंद झाला आहे. वादळी वारे आणि पावसामुळे बॅरेज केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाला असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे पाणी उचल आणि शुद्धीकरण प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी अंबरनाथ आणि बदलापूर शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. सोमवार आणि मंगळवारी होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अनियमीत असेल अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे असलेले पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्यातील गढुळता वाढली

मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मोठ्या प्रमाणावर गाळही साचत असतो. त्यामुळे पाणी गढूळ येत असते. हे पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने केले जाते. मात्र त्यानंतरही गढुळता टिकून असते. आताही ही गढुळता वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.