कल्याण – कल्याण जवळील चिंचवली गावात हनुमान मंदिरातील भगवे झेंडे अज्ञात इसमाने जाळून टाकल्याची घटना गुरुवारी उघडकीला आली. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याने नडगावचे पोलीस पाटील जगदीश लोणे यांच्या पुढाकारातून चिंचवलीतील ग्रामस्थाने याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुध्द तक्रार केली आहे.

पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की कल्याण तालुक्यातील चिंचवली गावात हनुमान मंदिर आहे. हनुमान जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी भगवे झेंडे तयार करून मंदिरात ठेवले होते. गुरुवारी सकाळी चिंचवलीतील ग्रामस्थ आकाश कशिवले हे सकाळी साडे सात वाजता गावातील हनुमान मंदिरात पुजा करण्यासाठी गेले. त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. संशय आल्याने त्यांनी मंदिराचा आतील भाग फिरून पाहिला. त्यांना हनुमान जयंती निमित्त मंदिरात तयार करून ठेवलेल्या भगव्या झेंड्यातील काही झेंडे मंदिरात आणि बाहेर जाळून टाकण्यात आल्याचे दिसले. तसेच, मंदिरात हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लावण्यात आला होता. पायाला शेंदूर लागलेले पायांचे ठसे मंदिरात दिसत होते. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य अज्ञात इसमाने केले असण्याचा संशय आकाश कशिवले यांना आला.

त्यांनी नडगावचे ग्रामस्थ जगदीश लोणे यांना घडला प्रकार सांगितले. ते तात्काळ चिंचवली येथे आले. चिंचवलीचे ग्रामस्थ दिनेश कशिवले, हर्षल कशिवले, रंजित भोईर, बाळासाहेब बोरसे हनुमान मंदिरात दाखल झाले. इतरही ग्रामस्थांची मंदिरात गर्दी झाली. पोलीस पाटील लोणे यांच्या उपस्थितीत मंदिर आणि परिसरात अज्ञात इसमाने जाळलेल्या झेंड्यांची माहिती घेण्यात आली. हेतुपुरस्सर हा प्रकार अज्ञाताकडून केला असण्याचा संशय उपस्थितांनी व्यक्त केला. याप्रकरणी पोलीस पाटील जगदीश लोणे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थ आकाश कशिवले यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात इसमाचा तपास सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, डोंबिवली जवळील खोणी गावातील शेतकरी मोतीराम जुमारे यांच्या मालकीच्या जागेत घरापासून दूर अंतरावर देव होते. तेथे मोतीराम जुमारे दररोज देवाला तेलवात करत होते. गेल्या आठवड्यात ते नेहमीप्रमाणे तेलवात करण्यासाठी गेले. त्यांना आपल्या मालकीच्या जागेतील देव, तेथील समई अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे आढळले. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक मंदिरांमध्ये चोरट्यांनी चोऱ्या करून मंदिरातील किमती ऐवज चोरून नेला आहे.