नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे

ठाणे :  राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार निधीतून केलेल्या कामांचे कळवा पुर्व भागात लावलेले एलईडी फलक पालिका अधिकाऱ्यांनी काढले असून याच मुद्द्यावरून सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप करत आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. यामुळे आधीच राजकीय वातवरण तापलेले असतानाच, आता एलईडी फलकांच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : कळव्यात मोटारीने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह माजी चार नगरसेवकांना गळा लावत त्यांना रविवारी पक्षात प्रवेश दिला. त्याच दिवशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदार विशेष निधीतून मुंब्रा आणि कळवा भागात होणाऱ्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे, मोरेश्वर  किणे, अनिता किणे, विश्वनाथ भगत यांनी उपस्थिती लावली होती. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुंब्रा – कळवा या त्यांच्याच मतदारसंघात दुहेरी कोंडी करण्याचे काम बाळासाहेबांची शिवसेनेकडून करण्यात आल्याचे चित्र दिसून आले होते. असे असतानाच, सोमवारी सकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार निधीतून केलेल्या कामांचे कळवा पुर्व भागात लावलेले एलईडी फलक पालिका अधिकाऱ्यांनी काढल्याची बाब समोर आली आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आनंद दिघेंसह प्रकाश परांजपेंनाही होते मान्य; आनंद परांजपे यांनी जुनी छायाचित्र दाखवून केला दावा

एलईडी फलक काढून टाकल्याबाबत आमदार आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक संदेश प्रसारित करत पालिका अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. ‘किती हे सुडाचे राजकारण… कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत, त्या कामांचा उल्लेख असलेला एलईडी फलक आमदार निधीतून लावण्यात आला होता. आज सकाळी अचानक ८ वाजता महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्या बोर्डची मोडतोड करून तो बोर्ड काढण्यात आला, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. मी मनिष जोशी यांना फोन केला असता, त्यांचे उत्तर साध्या आणि सोप्या शब्दात होते, काय करणार साहेब कोणाला फोन आल्यावर नाही म्हणू शकतो का मी. याचा अर्थ फोन कुणाचा आला असेल ते मला समजत. मी केलेली कामे आणि जनजागृतीचे संदेश त्या फलकावर होते, असे आव्हाड यांनी संदेशात म्हटले आहे. या संदेशाच्या माध्यमातूुन आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार आणि नगरसेवकांच्या निधीमधून जे एलईडी फलक लावण्यात आले आहेत. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी लावलेले एलईडी फलक सोमवारी सकाळी काढण्यात आले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना वेगळा न्याय आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना वेगळा न्याय, अशी विचारणा करत आयुक्त अभिजीत बांगर हे कधीपासून असे वागायला लागले आहेत? असा प्रश्न राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे. महापालिका जर अशा पद्धतीने वागणार असेल तर रस्त्यावर उतरुन आम्हाला विरोध करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> येऊरचे बंगले वाचविण्यासाठीच माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश; राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शकुनी मामा हे आता ज्योतिषही बघतात का? शकुनी मामा यांचे महापौरपद गेल्यानंतर त्यांनी अर्धवेळ ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. काल ते म्हणाले की, मुंब्रा येथून जितेंद्र आव्हाड यांचा शेवट सुरु झाला आहे. आपणाला माहित नव्हते की ते ज्योतिष झाले आहेत. माझी त्यांना एवढीच विनंती आहे की, १४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नियमित सुनावणी सुरु होत आहे. या १६ जणांमध्ये घटनाबाह्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे हे आमदार अपात्र ठरल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील का, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अस्तित्व राहिल का आणि वेळ अशी येईल का की त्यांना कमळाबाईमध्ये प्रवेश करुन आपली राजकीय वाटचाल करावी लागेल का,  हे भविष्य त्यांनी आधी बघावे, असा टोला आनंद परांजपे यांनी नरेश म्हस्के यांना लगावला आहे. तसेच आपण श्रीकांत शिंदे यांना फार गांभीर्याने घेत नाही. ते काय म्हणतात, यापेक्षा २०२४ च्या निवडणुकीत २०१९ पेक्षा अधिक मताधिक्याने जितेंद्र आव्हाड निवडून येतील. श्रीकांत शिंदे आणि शकुनी मामा यांना काय वाटतेय, यापेक्षा कळवा- मुंब्य्राच्या लोकांना काय वाटतेय, हे अधिक महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.