ठाणे – स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील ७७७ गावांमध्ये केंद्र शासनामार्फत पाहणी होणार आहे. या पाहणीमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा वापर, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्या स्वच्छतेविषयीच्या मानसिकतेत झालेला बदल समजून घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामस्थांनी लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून सार्वजनिक सुविधा नियमित वापरून परिसर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवावा, असे आवाहन केले आहे.
ठाणे जिल्ह्यात दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या उपक्रमात प्रत्येक ग्रामपंचायत सहभागी होत असते. केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीची अद्यावत माहिती घेऊन उभारण्यात आलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांची चाचणी आणि तपासणी करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक प्रत्येक ग्रामपंचायतीची तपासणी आणि पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार, प्रत्येक ग्रामपंचायतीची तपासणी करून १ हजार गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे जिल्ह्याचे गुणांकन ठरणार आहे. जिल्ह्यांच्या गुणांकनावरुन राज्याचे गुणांकन देशपातळीवरती ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावाने आपापल्या सुविधांचा वापर नियमित केला पाहिजे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
या पाहणीत असे होणार गुणांकन
या पाहणी दरम्यान प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन म्हणजेच वर्गीकरण केंद्राची पाहणी, खतखड्यांचे व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच गृहभेटीतून मिळणारी माहिती इत्यादी बाबत गुणांकन होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी केले. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांबाबत थेट निरीक्षणासाठी १२० गुण आहेत. ग्रामस्थांचा प्रतिसादासाठी १०० गुण, गावातील सुविधांचा वापराबाबत २४० गुण तर, प्रत्यक्ष पाहणी आणि निरीक्षणा दरम्यान ५४० गुणांची प्रश्नावली असणार आहे. असे एकूण १००० गुणांपैकी प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे देशातील व महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ सुंदर गाव आणि ग्रामपंचायत घोषित होणार आहे.