लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली पूर्व, पश्चिम भागातील मुख्य वर्दळीच्या, अंतर्गत रस्त्यांवर सेवावाहिन्या टाकण्यासाठी विविध कंपन्यांनी रस्त्यांच्या कडा खोदून ठेवल्या आहेत. जागोजागी खड्डे आणि मातीचे ढिगारे, खोदलेले रस्ते असे चित्र शहरात दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केली नाहीत तर शहरभर चिखल, वाहन कोंडीचे चित्र दिसेल अशी शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

डोंबिवली शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर मोबाईल, महावितरण, महानगर गॅस आणि इतर सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी जागोजागी खोदून ठेवले आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर चार ते पाच फुटाचा खड्डा आणि त्याच्या भोवती मातीचा ढीग असे चित्र आहे. या रस्त्यांवरुन वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत अवजड मोठे वाहन असेल तर पादचाऱ्यांना रस्ता सोडून बाजुला उभे राहावे लागते. याच प्रकारातून गेल्या महिन्यात दत्तनगर भागात डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्यावर एका डम्परच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा… कल्याणमध्ये ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी तरुणी, महिलांची गर्दी

दत्तनगर भागात कोंडी

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर, शिवमंदिर स्मशानभूमी रस्ता, संगीतावाडी रस्ता भागात मागील तीन महिन्यांपासून पदपथ, गटारे बनविण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करताना जागोजागी खोदून ठेवण्यात आले आहे. शिवमंदिर स्मशानभूमी समोरील गटार, पदपथावरील चांगल्या लाद्या, पेव्हर ब्लाॅक काढून तेथे नव्याने कामे हाती घेण्यात आली. दत्तनगर भागात गटारे बनविताना सिमेंटमध्ये वाळू ऐवजी ग्रीट (खडकाची पावडर) वापरण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. निकृष्ट पध्दतीने ही कामे केल्याने या कामांचे आयुष्य खूप कमी असेल असे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. या कामाची गुणवत्ता व गुणनियंत्रण विभागाने चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

हेही वाचा… ठाणे : महावितरणच्या कार्यालयाला आग

मागील तीन महिन्यांपासून दत्तनगर, शिवमंदिर, संगीतावाडा भागातील रस्ते गटार, पदपथ बांधण्याच्या नावाखाली खोदून ठेवण्यात आल्याने या भागातील धुळीच्या सततच्या उधळयाने, अवजड मालवाहू वाहनांमुळे नागरिक हैराण आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी करुन ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहने चालविणे अवघड होऊ जाते.

हेही वाचा… मुंब्र्यात वीज चोरीप्रकरणी एकास अटक; पाच लाखांच्या वीज चोरी केल्याचे उघड

एकीकडे पालिकेत पैसा नाही असे सांगितले जाते मग दत्तनगर भागातील पदपथ, गटारांसाठी पैसा आला कोठुन असे प्रश्न लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. दत्तनगर, संगीतावाडी हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या भागातील कामे संथगतीने सुरू असल्याने या भागातील शिवमंदिर स्मशानभूमीत पार्थिव नेताना वाहन कोंडीचा सामना नातेवाईकांना करावा लागतो.

खोदकामे सुरूच

१५ मे नंतर शहरातील रस्त्यांवर खोदकामास परवानगी नसताना अनेक सेवा कंपन्या खोदकाम करत असल्याने पालिकेने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. दिनदयाळ रस्ता, एकतानगर, नांदिवली मठ रस्ता, एमआयडीसीमधील रस्ते, संत नामदेव पथ, पेंडसेनगर रस्ता भागात रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेवा पुरवठादार कंपन्यांकडून पालिकेकडे दराप्रमाणे देयक भरणा केला जातो. त्याप्रमाणे कामासाठी परवानगी दिली जाते. पालिकेकडून ठेकेदार नेमून खोदलेल्या रस्त्यांवरील डांबरीकरणाची कामे पूर्ण केली जातात. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण केली जातील, असे बांधकाम विभागातील एका अभियंत्याने सांगितले.