ठाण्यात सावरकरनगर भागातील म्हाडाच्या सोसायट्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय आमच्या पाठपुराव्यामुळेच झाल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेनेही आमच्या पाठपुराव्यामुळेच हे काम झाल्याचे सांगत राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. यामुळे राज्यात एकत्रित सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ठाण्यातील नेत्यांमध्ये कामाचे श्रेय घेण्यावरून पुन्हा जुंपल्याचे चित्र दिसून येत आहे.

खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई रंगली होती. हा वाद निवळत नाही, तोच आता सावरकरनगर भागातील म्हाडाच्या सोसायट्यांच्या लीज भाडे आणि अकृषी करांवरील व्याज आणि दंड माफ करण्याच्या कामावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवाद सुरू झाला. सावरकरनगर भागामध्ये म्हाडाच्या ११० सोसायट्या आहेत. सोसायट्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या कामावरूनच शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरु झाली.

“हे लोकांच्या वरातीत फुकटचे नाचायचे उद्योग”

भाडेपट्टी करार आणि अकृषिक करांवरील व्याज आणि दंड माफ करुन या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे. मात्र, हा प्रश्न निकाली लागल्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के हे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अमित सरैय्या आणि मयूर शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. परंतु दुर्देवाने ‘नाच ना जाने अंगण तेढा’ या प्रमाणे या कामाचे श्रेय राष्ट्रवादीचे असतानाही लोकांच्या वरातीत फुकटचे नाचायचे असे उद्योग दिलीप बारटक्के यांच्याकडून केले जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.

“पूर्वी दुसर्‍याचे श्रेय लाटण्याची संस्कृती शिवसेनेमध्ये नव्हती, पण…”

या पूर्वी असे दुसर्‍याचे श्रेय लाटण्याची संस्कृती शिवसेनेमध्ये नव्हती. परंतु नरेश म्हस्के हे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेमध्ये दुसर्‍याचे श्रेय घेण्याची संस्कृती वाढीस लागली आहे. काम दुसर्‍याचे आणि बॅनर स्वत:चा लावायचा, असे प्रकार ते करीत आहेत. ते कलियुगातील नारद आहेत, असा टोलाही परांजपे यांनी लगावला. गोरगरीबांना फायदा व्हावा, या उद्देशातून जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय घेतला असतानाही बारटक्के यांनी पत्रके वाटून श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

“आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा प्रयत्न”

आयत्या बिळावर नागोबा बनण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यांना आम्ही खुले आव्हान देतो की, म्हाडाच्या ११० सोसायटयांचा प्रश्न कोणी मार्गी लावला. त्यासाठी कितीवेळा बारटक्के म्हाडा कार्यालयात गेले, किती अधिकार्‍यांशी बोलले, ही प्रक्रिया कशी होती, कितीवेळा नागरिकांच्या बैठका घेतल्या, याचे पुरावे त्यांनी सादर केले, तर आपण राजकारण सोडू. तसेच पुरावे सादर करता आले नाही, तर बारटक्के यांनी जाहीर माफीनाम्याचेही पोस्टर्स लावावेत, असे आव्हान अमीत सरैय्या यांनी दिले आहे.

हेही वाचा : ठाण्यातील बेपत्ता शिवसेना शाखाप्रमुख प्रकरणी मोठी घडामोड; आत्महत्या करत असल्याचं पत्र सापडल्याने उडाली होती खळबळ

शिवसेनेचा राष्ट्रवादीवर पलटवार

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के म्हणाले, “सोसायट्यांचे भाडेपट्टी करार आणि अकृषिक करावर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड माफ करण्यासाठी २०२० पासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्या स्तरावर व्याज आणि दंड माफ करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.”

“म्हाडाचे विषय आम्ही पुर्वीपासूनच सोडवित आहोत. परंतु गेले पाच वर्षे गायब असलेले सरैय्या आता निवडणुकांच्या तोंडावर या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला श्रेय घेण्याची गरज नसून म्हाडा वासियांचा आमच्यावर विश्वास आहे. तसेच आनंदर परांजपे यांनी निवडणुक लढवून निवडून यावे आणि मग बोलावे,” असं दिलीप बारटक्के यांनी सांगितलं.