डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिन दयाळ या वर्दळीच्या रस्त्यावर ३० वर्ष जुनी हरी निवास नावाची इमारत असून ती धोकादायक झाल्याने तिचे सिमेंटचे लगदे हळूहळू पडत होते. मुसळधार पाऊस सुरू झाल्यापासून ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती होती. रस्त्यावर इमारत कोसळली तर वाहतुकीला अनेक दिवस अडथळा येण्याची शक्यता असल्याने पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाने ही धोकादायक इमारत जमीनदोस्त केली.

हरी निवास इमारतीमध्ये १७ सदनिका, ११ गाळे होते. या इमारतीत काही रहिवासी राहत होते. त्यांना तेथून स्थलांतर करण्याच्या नोटिसा ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी बजावल्या होत्या. गाळेधारक यापूर्वीच गाळे रिकामे करून गेले आहेत. इमारत रहिवास मुक्त झाल्यानंतर साहाय्यक प्रमोद पाटील यांनी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांना पत्र देऊन या पाडकामासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळून देण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक गित्ते यांनी ती मागणी मान्य केली. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या इमारतीच्या परिसरातून जाताना पादचारी, वाहन चालक विशेष काळजी घेत होते. ही इमारत तोडावी म्हणून परिसरातील रहिवाशांचा आग्रह होता. या इमारतीमुळे आजुबाजुच्या इमारतींना, रस्ते मार्गाला धोका निर्माण होणार होता. त्यामुळे साहाय्यक आयुक्त पाटील यांनी तातडीने ही इमारत तोडण्याचा निर्णय घेतला. हरी निवास इमारतीच्या तोडकामाचे नियोजन करून वर्दळीच्या रस्त्यावरील ही इमारत जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. ही धोकादायक इमारत तोडल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.