ठाणे – पावसाळ्यात अतिधोकादायक इमारती कोसळून जिवितहानी होऊ नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात एकूण ९० इमारती अतिधोकादायक आढळून आल्या होत्या. त्यापैकी ४१ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात पालिकेला यश आले आहे तर, ४९ इमारतींमध्ये २१७ कुटूंबे राहत असल्याची बाब पुढे आली आहे. रहिवाशी इमारती रिकाम्या करत नसल्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे. क्लस्टर योजनेसाठी इमारत धोकादायक ठरविली जात असल्याचा संशय, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद, इमारतींच्या सरंचनात्क परिक्षणाचे दोन वेगवेगले अहवाल, अशा कारणांमुळे रहिवाशी इमारती रिकाम्या करत नसल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.
ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारत कोसळून जिवीतहानी होण्याचे प्रकार यापुर्वी घडले आहेत. अशा घटनांची पुनर्रावृत्ती होऊ नये याची काळजी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी घेण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी शहरात सर्वेक्षण करून अतिधोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. अशाचप्रकारे यंदाही पालिका प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय शहरातील इमारतीचे सर्वेक्षण सुरू केले असून त्यात एकूण ९० अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या.
या अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापुर्वी म्हणजेच मे महिन्यात रिकाम्या करण्याची कारवाई प्रशासनाकडून हाती घेण्यात आली होती. यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने संबंधित इमारतीमधील रहिवाशांना नोटीसा बजावून इमारत रिकामी करण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच अशा इमारतींमुळे जिवितास धोका असल्याबाबत पालिकेने रहिवाशांना कळविले होते. यानंतर पालिकेला आतापर्यंत ९० पैकी ४१ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात यश आले आहे. उर्वरित ४९ इमारतींमध्ये आजही रहिवाशी राहत असल्याची बाब पुढे आली आहे.
इमारत रिकामी न करण्याची कारणे
काही ठिकाणी मालक आणि भाडेकरूंमध्ये वाद आहेत. यामुळे मालक आणि भाडेकरू दोघेही इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करतात. त्यामध्ये एक अहवाल अतिधोकादायक तर दुसरा अहवाल धोकादायक असा परस्परविरोधी आले होते. याठिकाणी त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचा पर्याय असतो. पण, त्याचा खर्च अधिक असल्याने रहिवाशी तयार होत नाहीत. तसेच क्लस्टर योजनेसाठी इमारत धोकादायक ठरविली जात असल्याचा चुकीचा संशय, अशा कारणांमुळे रहिवाशी इमारती रिकाम्या करत नसल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.
कोट
ठाणे महापालिका क्षेत्रातील ४१ इमारती रिकाम्या करून त्या पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींवरही जून महिना अखेर पर्यंत तोडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी या इमारत धारकांना नोटीस बजावण्यात येणार असून येथील नागरीकांनीही अशा इमारतीत राहू नये आणि महापालिकेला सहकार्य करावे. – शंकर पाटोळे, उपायुक्त, ठाणे महापालिका
इमारतींची आकडेवारी
क्षेत्र | एकूण संख्या | रहिवास व्याप्त | रिकाम्या |
नौपाडा | ३८ | २० | १८ |
कोपरी | १७ | १२ | ५ |
वागळे इस्टेट | – | – | – |
लोकमान्यनगर | ६ | – | ६ |
वर्तकनगर | – | – | – |
माजीवडा | ८ | ४ | ४ |
उथळसर | ९ | ७ | २ |
कळवा | ८ | ५ | ३ |
मुंब्रा | १ | १ | – |
दिवा | ३ | – | ३ |
एकूण | ९० | ४९ | ४१ |