ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात होणाऱ्या वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना खडसावून नाराजी व्यक्त केली. ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ठाणे जिल्ह्यातील विशेषत: घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज वाहन चालकांना प्रचंड कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुक कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. तर विद्यार्थ्यांच्या बसगाड्या देखील कोंडीत अडकून असतात. घोडबंदर भागात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांकडून आता प्रशासनावर टीका होऊ लागली आहे. याच खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आणि वाहतुक कोंडी सोडविण्यात आलेल्या अपयशामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

ठाण्यात कोपरी, माजिवडा यासोबत घोडबंदर रस्ता, गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल, शिळफाटा परिसर येथे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्याबद्दलच्या तक्रारी वारंवार येत असून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा पूर्ण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सोमवारी झालेल्या बैठकीत दिले.

या बैठकीस ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दुरध्वनीद्वारे सूचना दिल्या.

रस्ता दुरुस्ती तात्काळ करा – गायमुख घाटातील रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत असून या समस्येवर अजूनही तोडगा काढण्यात यश आलेले नाही. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर, वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करून ठाणे, भिवंडी, शिळफाटा आणि कोपरी या चारही भागातील वाहतूक कोंडीवर मात करावी.

रस्ते दुरुस्ती करताना त्या कामाचा दर्जा चांगला असावा. रस्त्यावर दुरुस्तीचे उंचवटे तयार होऊ नयेत. त्याने अपघात होतात, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. खड्डे मुक्ती झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरून खड्डे मुक्ती करावी, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.