ठाणे : ठाणे जिल्ह्याचे १ ऑगस्ट २०१४ रोजी विभाजन होऊन पालघर जिल्हा अस्तित्वात आला. ठाणे जिल्ह्याने विकासाची गती कायम राखली. विभाजनाला दहा वर्षे उलटल्यानंतरदेखील पालघरमध्ये उत्तम आरोग्य सुविधा, पक्के रस्ते आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थांचा अभाव दिसून येतो. मोठे उद्योग नसल्याने रोजगारनिर्मितीचे प्रमाणदेखील कमी आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पायाभूत सुविधांवर त्याचा परिणाम झाला. ठाण्याला प्राधान्य मिळत असल्याने विकासासाठी पालघरचे विभाजन व्हावे अशी मागणी होऊ लागली. याची दखल घेत २०१४ साली पालघर स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला.
रोजगाराचा मुद्दा गंभीर
पालघर जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. त्यावर मात करण्यासाठी पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प, वाढवण बंदर, विशेष रेल्वे वाहतूक मार्गिका असे विकासकामांचे जाळे विणले जात आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्था आणि विजेची समस्या प्रमुख असल्याने यासाठीदेखील काम करणे महत्त्वाचे ठरते. तर याच पद्धतीने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थादेखील हवी तशी सक्षम नसल्याने अनेकदा नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या समग्र विकासाकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. तर पालघर जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी शासन आणि सरकार यांनी ताळमेळ साधून योजनांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी गळतीचे प्रमाण अल्प
पालघर जिल्ह्यात सन २०२३-२४ मध्ये २५२६ प्राथमिक शाळा, ५१० माध्यमिक शाळा, २४४ उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालयासह) शाळा व ८० महाविद्यालये आहेत. तर पाचवीपर्यंत विद्यार्थी गळतीचे प्रमाण १.१८ टक्के आणि आठवीपर्यंत ३.०२ टक्के आहे. तर ठाणे जिल्ह्यात सन २०२३-२४ मध्ये ३१०१ प्राथमिक शाळा, १०९६ माध्यमिक शाळा, ५५३ उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालयासह) शाळा व २८२ महाविद्यालये आहेत. एक लाख लोकसंख्येमागे प्राथमिक शाळा ३२, माध्यमिक ११, उच्च माध्यमिक ६ व महाविद्यालय ३ असे प्रमाण होते. गळतीचे प्रमाण हे पाचवीपर्यंत २.७५ इतके आहेत, तर ८ वीपर्यंत २.३२ टक्के इतके आहे.
रोजगारासाठी मोठे उद्योग महत्त्वाचे
पालघर जिल्ह्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची संख्या ही ४४ हजार १७९ इतकी आहे. तर यातील रोजगार संख्या १ लाख ८९ हजार ९३ इतकी आहे. तर ठाणे जिल्ह्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संख्या ही १ लाख २६ हजार २९५ इतकी असून यातून ८ लाख ९४ हजार ६५ इतकी रोजगार निर्मिती झाली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात लहान तसेच मोठ्या उद्योगांची उभारणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ठाणे तिसऱ्या स्थानी : राज्यात भौगोलिकदृष्ट्या ३३ व्या क्रमांकावर असलेला ठाणे जिल्हा लोकसंख्येच्या बाबतीत मात्र तिसऱ्या स्थानी आहे. तर पालघर भौगोलिकदृष्ट्या २८ व्या क्रमांकावर असून लोकसंख्येच्या बाबतीत १४ व्या स्थानी आहे.
बँक शाखांचे जाळे
पालघर जिल्ह्यात सद्या:स्थितीत ३७ बँका असून जिल्हा अग्रणी बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र कार्यरत आहे. तर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये ३१७ ठिकाणी या विविध बँकांची कार्यालये आहेत. यात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या कमी आहे. तर ठाणे जिल्ह्यात सद्या:स्थितीत ३७ वर्गीकृत बँका असून सात तालुक्यांमध्ये १०७४ ठिकाणी या विविध बँकांची कार्यालये आहेत. यामुळे नागरिकांना त्यांच्या दोन किलोमीटरच्या परिघात सर्वाधिक बँका या ठाणे जिल्ह्यात उपलब्ध आहे. मात्र पालघरमध्ये ती स्थिती नाही.
प्रायोजक
● मुख्य प्रायोजक : सारस्वत कोऑप बँक लिमिटेड
● पॉवर्ड बाय : महानिर्मिती, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
● नॉलेज पार्टनर : गोखले इन्स्टिट्यूट, पुणे</p>