डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान तत्त्वचिंतक होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. त्यांनी काय लिहिले आहे हे नंतर वाचा. पण ते वाङ्मय पाहण्याची तरी तसदी घ्या, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच येथे केले.
‘रेल चाइल्ड’ संस्थेच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त सरस्वती विद्यामंदिराच्या पटांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगरसेवक राजेंद्र देवळेकर, माजी नगरसेवक काका हरदास, संस्था अध्यक्ष विवेध द्याहडराय, सुरेश खेडकर उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. पण बाबासाहेबांनी ज्या वाङ्मयात आपले विचार व्यक्त केले आहेत, ते एकदा वाचायला हवेत. वाचायला वेळ नसेल तर ते नजरेखालून घालण्याची तसदी घ्या, असे आवाहन शिवशाहिरांनी या वेळी केले. बाबासाहेबांचे साहित्य वाचून त्यामधील दहा टक्के विचार आत्मसात केले तरी महान कार्य उभे राहील, असा विश्वास शिवशाहिरांनी व्यक्त केला. शिवाजी महाराजांचा काळ बाबासाहेबांनी आपल्या ओघवत्या शैलीतून मांडला.
शिवाजी महाराज हे फक्त टाळ्या वाजवण्यापुरते मर्यादित नाहीत आणि टाळण्यासारखे तर अजिबात नाहीत. व्हिएतनाम या छोटय़ा देशाने एकदा अमेरिकेला हरवले. हे कसे शक्य केले. यावर व्हिएतनामच्या अध्यक्षांनी शिवाजी महाराजांची गनिमा कावा नीती आम्ही वापरली, असे उत्तर भारत भेटीवर आल्यावर दिले होते. शिवाजी महाराज आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही जग जिंकले असते, असे उत्तर त्या अध्यक्षाने दिले, असे बाबासाहेबांनी सांगितले. सूत्रसंचालन योगेश जोशी यांनी केले. चित्रा घोसाळकर यांचे गायन झाले.

‘पुढच्याचे पाय ओढू नका’
यश संपादन करून दुसरा पुढे जात असेल तर तुम्ही पण प्रयत्न करून पुढे जा. पण पुढे जात असलेल्या व्यक्तीच्या मार्गात अडथळा आणू नका. आपण नेहमी दुसरा पुढे जात असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अनेक बाबतींत आपण मागे पडतो, असे ते म्हणाले.