ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी एक विधान केले असून यानंतर ठाणे जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. शिंदेच्या शिवसेनेने ठाण्यात संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विधानाचा निषेध नोंदविला. त्यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना राऊत यांना उद्देशून तर आनंद दिघेच तुम्हाला चमत्कार दाखवतील, असे म्हटले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी एक विधान केले आहे. “ शिंदे यांचे नेते मोदी आहेत. तुम्ही बाळासाहेबाच्या बाजुला जिल्हाप्रमुखाचे फोटो लावता. ही कोणती नवी पद्धत आणली. आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते नव्हते, उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. आनंद दिघे यांचा संपूर्ण आदर ठेवून मी हे बोलत आहे की तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करायचे आहे म्हणून हे तुम्ही करत आहात का”, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या विधानांतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या असून टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे युवा सेनेने राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळ्याच दहन करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

एकनाथ शिंदे यांचा इशारा

खासदार नरेश म्हस्के आणि पदाधिकारी हेमंत पवार यांनी संजय राऊतांच्या विधानाला प्रतिउत्तर दिले आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या कार्याची उंची कोणीही मोजू शकत नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवा आणि जनसेवेसाठी समर्पित केले आहे. दिघे यांनी जे समाजकारण केले त्याला तोड नाही. आनंद दिघेंची जे लोक थट्टा करतील, त्यांना आनंद दिघेच चमत्कार दाखवतील,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटले.

आनंद दिघे कोण होते

ठाणे जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात ठाणे शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत शिवेसना पोहोचवण्याचे काम करणारे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे २३ वर्षांपूर्वी निधन झाले. पण, ते हयातीत असतानाही त्यांचा मोठा चाहता वर्ग होता आणि तो निधनानंतरही कायम असल्याचे चित्र सातत्याने दिसून येते. त्यांच्या नावाचा करिष्मा आजही कायम असल्याचे निवडणुकीत दिसून येतो. शिवसेनेत दोन गट पडले पण, दोन्ही गटातील नेते आणि शिवसैनिक मात्र दिघेंना गुरुस्थानी मानतात. शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असे जणू समिकरणच तयार झाले होते. यातूनच ‘शिवसेनेचा बालेकिल्ला…आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा’ अशी घोषणा उदयास आली होती. शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती.