अखेरच्या सभेत महापौरांची टोलेबाजी ठाणे : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ९० जागांवर नगरसेवक निवडून येतील, असा दावा करत महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत विरोधकांवर निशाणा साधला. ५ मार्च रोजी ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापूर्वी बोलविण्यात आलेल्या अखेरच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी-भाजप नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगला. यावेळी ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येईल असा दावा करत उर्वरित ५२ जागांसाठी तुम्हाला शुभेच्छा अशा शब्दांत महापौरांनी टोलेबाजी केली. शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती होती. त्यामुळे भांडणे होऊन घरातून बाहेर पडलो तरी नाते तुटत नसते, असे विधानही महापौर म्हस्के यांनी यावेळी केली. एकहाती सत्तेचा पुनरूच्चार करताना राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही अशी अप्रत्यक्ष भूमिकाही म्हस्के यांनी यावेळी मांडली. या सभेत विषय पटलावरील प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर महापौर म्हस्के यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाच वर्षांच्या कार्यकाळातील अनुभव कथन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तर महापौरांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना टोले मारले. महाविकास आघाडीतील मित्र स्नेह भोजन कार्यक्रमाला आले नसले तरी भाजपचे सर्व नगरसेवक मात्र कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती होती. त्यामुळे भांडणे होऊन घरातून बाहेर पडलो तरी नाते तुटत नसते, असे विधानही त्यांनी केल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. प्रस्थापितांना धक्का सभागृहात काही प्रस्थापित नगरसेवकांची मक्तेदारी होती. त्यामुळे महापौर झाल्यानंतर प्रस्थापितांना ठरवून धक्का दिला आणि नव्या नगरसेवकांना पुढे येण्याची संधी दिली. करोनाकाळात सत्ताधारी पक्ष असल्यामुळे पक्षावर टीका होत होती, परंतु हाडाचा शिवसैनिक असल्यामुळे सर्वाना अंगावर घेतले. तसेच स्वत:वर भ्रष्टाचाराचा एकही आरोप होऊ दिला नाही. हे सर्व करताना मैत्रीही जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, अशी टोलेबाजी महापौरांनी केली.