डोंबिवलीतील ब्राम्हण उद्योजक परिषदेत उद्योजकांची मते
बदलते राजकीय वातावरण, उद्योग स्नेही केंद्र, राज्य सरकारची धोरणे. नवउद्योजकांसाठी सरकारने आखलेले विविध उपक्रम या सर्व संधींचा पुरेपूर लाभ उचलून ब्राम्हण उद्योजक, व्यावसायिकांनी गुणवत्तापूर्ण उत्पादन करुन देशाच्या विकासात महत्वाचे योगदान द्यावे, अशी मते मंगळवारी येथे ब्राम्हण उद्योजकांच्या परिषदेत ब्राम्हण समाजातील विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यासायिकांनी व्यक्त केली.
‘ब्राम्हण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’ (बीबीएनजी) या ब्राम्हण उद्योजक, व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे डोंबिवलीत येत्या फेब्रुवारी मध्ये देश, विदेशातील विविध ज्ञाती मधील ब्राम्हण उद्योजकांची एक परिषद आयोजित केली आहे. या संस्थेच्या मुंबई विभागाच्या कल्याण-डोंबिवली शाखेच्या पुढाकाराने ही परिषद होणार आहे. या परिषदेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून मंगळवारी डोंबिवली एमआयडीसीतील दुर्वांकुर सभागृहात २०० ब्राम्हण उद्योजक, व्यावसायिकांची एक परिषद सकाळी आयोजित केली होती. यावेळी उद्घाटनाच्या भाषणात जोगळेकर बोलत होते.
हेही वाचा >>> ठाणे : गावदेवी मैदान पुर्ववत केल्याशिवाय वाहनतळाचे लोकार्पण करू देणार नाही; भाजपच्या माजी नगरसेवकांनी दिला इशारा
या कार्यक्रमाला ‘बीबीएनजी’चे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, संस्थेचे संचालक अरविंद कोऱ्हाळकर, मधुरा कुंभेजकर, ॲड. महेश जोशी, उद्योजक विलास जोशी उपस्थित होते.
उद्योग, व्यवसाय हा ज्यांचा पिंड आहे. अशा पंजाबी समाजाचे गुरुस्थान असलेल्या गुरुनानक जयंतीदिनी हा कार्यक्रम ठेऊन परिषदेची एक चांगली सुरुवात झाली आहे. डोंबिवलीत उद्योजक म्हणून दिसतात पण परिषदेत दिसत नाहीत अशा उद्योजक, व्यावसायिकांना परिषदेसाठी उपस्थिती लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर यांनी केले.
शिक्षणाच्या वाटचालीतील विचार, विकास आणि व्यवहार ही सुत्री घेऊन परिषदेचे नियोजन केले आहे. केंद्रात, राज्यात उद्योगाला प्रोत्साहन देणारे सरकार आहे. या संधींचा पुरेपूर लाभ घेत, सरकारी योजनांचा लाभ पदरात पाडून ब्राम्हण व्यावसायिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. या योजनांमधून समाज विकास, व्यवहाराला चालना देऊन ब्राम्हण उद्योजकांची एक साखळी तयार करणे आवश्यक आहे. अशा परिषदा या समस्याग्रस्त उद्योजकांना उर्जा, प्रोत्साहित करतात. त्यांना मदतीचा एक हात अशा परिषदांमधून मिळतो, असे जोगळेकर म्हणाले.
१९९१ च्या उदारीकरण, आरक्षण धोरणामुळे बहुतांशी ब्राम्हण वर्ग विदेशात शिक्षण घेऊन स्थायिक झाला. विदेशातील माहिती तंत्रज्ञानाची बहुतांशी भिस्त भारतीय संगणक अभियंत्यांवर आहे. ब्राम्हणांचा आता सर्वक्षेत्रात संचार आहे. चीनच्या भारत विरोधी भूमिकेमुळे स्थानिक व्यवसाय वाढीला अनुकूल वातावरण आहे. या संधीचा फायदा ब्राम्हण व्यावसायिकांनी घेऊन गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार करावे. जगाच्या बाजारात स्वताच्या उत्पादना बरोबर देशाचे नाव मोठे करुन देश विकासात महत्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन जोगळेकर यांनी केले.
‘समाज प्रगती करणाऱ्याला कधीही एकत्र ठेवत नाही याचे भान ठेऊन इतर समाज कसा व्यवसाय, व्यवहार करतो याचा विचार करुन ब्राम्हण व्यावसायिकांनी उद्योग, व्यवसायात भरारी घ्यावी. या परिषदेमधून उत्पादन, विक्रेते, मार्गदर्शन यांची देवाणघेवाण होऊन साधा व्यावसायिक मोठी भरारी घेऊ शकतो. आपण देणाऱ्यापेक्षा दुसऱ्याकडून घेण्याचेही शिकलो पाहिजे, असे श्रीपाद कुलकर्णी म्हणाले.
परिवर्तन वारे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि उद्योजक विलास जोशी यांनी आता राज्यात परिवर्तन झाले आहे. चांगली कामी करणारी मंडळी राज्य सत्तेत आली आहेत. उद्योग, व्यवसायाच्या अनेक घोषणा होत आहेत. या सर्व संधीचा लाभ घेण्यासाठी आपणही पुढे आले पाहिजे, असे उद्योजक विलास जोशी सांगितले. ब्राम्हण नवउद्योजकांना साहाय्य करण्यासाठी आपण नक्कीच पुढाकार घेऊ, असे आश्वासन जोशी यांनी दिले.