केवळ आठवडय़ाच्या अंतरावर दिवाळी सण आला आहे. दिवाळीतील फटाके, तोरणे, फराळ, रांगोळी, कपडे, मिठाई, आकर्षक भेटवस्तू आदींनी बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. या बाजारपेठेत विविध आकाशकंदीलही लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीत आकाशकंदीलला मोठय़ा प्रमाणात महत्त्व आणि मोठी मागणी असते. शहरातील बाजारपेठ आकर्षक आणि टिकाऊ आकाशकंदिलांनी सजलेल्या दिसून येत आहेत. पर्यावरणाचे रक्षण व्हावे याची आता प्रत्येकाला जाणीव झाली आहे. त्यामुळे हे कंदीलही पर्यावरणस्नेही झाले आहेत. यंदा नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ह्य़ुमनिटी या संस्थेने स्वत: हाताने तयार केलेले पर्यावरणस्नेही आकाशकंदील बाजारात आणले आहेत.
आपल्या घरात, कार्यालयात, दुकानात आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करण्यात नागरिक उत्सुक असतात. पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही आकाशकदिलांना ग्राहकांकडून बाजारातून जास्त मागणी असते, परंतु त्यांची जागा चीनच्या आकाशकंदिलाने घेतल्याचे मोठय़ा प्रमाणात दिसून येते. आपल्या संस्कृतीचे व पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व लोकांना स्वदेशी वस्तू मिळाव्यात या उद्देशाने ह्य़ुमनिटी या संस्थेने स्वत: बांबू व कागदांपासून हाताने तयार केलेले लहान, मोठे कंदील बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून संस्थेचे नीलशार्दूल वडके आणि आशीष वडके यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. याद्वारे गरजूंना रोजगारनिर्मिती व्हावी, त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठीही सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या ठिकाणी कागदी प्रकारात आकर्षक आणि विविध रंगसंगती व रूपात आकाशकंदील मिळत आहे. त्यांच्या किमती ५०० रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आकाशकंदील लावण्यात येतो, तसेच व्यावसायिक व्यवसायाच्या तसेच उद्योगाच्या ठिकाणी आकाशकंदील लावून दिवाळी उत्साहात साजरी करत असतात. अशावेळी पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही आकाशकंदिलांना ग्राहकांकडून बाजारातून जास्त मागणी असते. विरार (प.) येथील ‘गप्पा-गोष्टी आणि डिल’ या कॅफेसह अनेक दुकानांत पर्यावरणस्नेही कंदील उपलब्ध झाले आहेत.