लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : ग्राहकाने आमच्याकडे गुंतवणूक केली तर त्याला दर महिन्याला २० टक्के परतावा दिला जाईल. अशा पद्धतीने गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत डोंबिवली, मुंबई परिसरातील गुंतवणूकदारांकडून डोंबिवलीतील दोन भामट्यांनी ४४ लाख रूपये जमा केले. गुंतवणूकदारांना मूळ रक्कम नाहीच, पण वाढीव व्याज न देता त्यांची फसवणूक केली आहे. या घटनेने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

केतन पवार (राहणार- प्रकाश प्रतीमा सोसायटी, खोली क्र. २०५, गरीबाचापाडा, डोंबिवली पश्चिम, प्रतीक प्रशांत रेमणे (रा. मायमाऊली सोसायटी, गावदेवी मंदिराजवळ, मानपाडा रस्ता, डोंबिवली पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत. मुंबईतील जोगेश्वरी भागात मेघवाडी येथे राहणारे अनिकेत अशोक तावडे (३४) यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे. तावडे हे या गुंतवणूक योजनेतील गुंतवणूकदार आहेत. त्यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे.ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

आणखी वाचा-ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

पोलिसांनी सांगितले, आरोपी केतन पवार आणि प्रतीक प्रशांत रेमणे यांनी डोंबिवली, मुंबई परिसरातील अनेक गुंतवणूकदारांकडून दरमहा २० टक्के गुंतवणुकीवर व्याज देण्याची योजना तयार केली. या योजनेची माहिती परिचितांना दिली. दरमहा २० टक्के व्याज मिळणार असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक केली. दरमहा व्याज मिळणे आवश्यक असताना गुंतवणूकदारांना दरमहा व्याज देण्यास आरोपी टाळाटाळ करू लागले.

सहा महिने उलटूनही आरोपी गुंतवणुकीवर वाढीव व्याज देत नाहीत म्हणून ग्राहकांनी आपली मूळ रक्कम परत देण्याची मागणी सुरू केली. त्याला आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. आरोपी ग्राहकांच्या संपर्काला प्रतिसाद देणे टाळाटाळ करू लागले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर तावडे यांच्या पुढाकाराने गुंतवणूकदारांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. ए. पिठे तपास करत आहेत.