भाज्यांची १५ ते २० रुपयांनी भाववाढ;
फळे २० ते ३० रुपयांनी कडाडली
यंदाच्या गणेशोत्सवात सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. भाज्यांचे भाव १५ ते २० रुपयांनी तर फळांचे भाव २० ते ३० रुपयांनी कडाडले आहेत. गणेशोत्सवात मांसाहार केला जात नसल्याने भाज्यांकडे कल असतो, तसेच गणपतीच्या पूजेसाठी फळांची मागणी अधिक असल्याने ही भाववाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
वसई-विरारमधील भाजी मंडईत भाववाढ झाल्याने गृहिणींना ऐन सणामध्ये पदरमोड करून खर्च करावा लागत आहे. सध्या बाजारात पडवळ, शिराळी, भोपळा, सुरण, कारले, टोमॅटो, कांदा, बटाट, भेंडी, गवार या भाज्यांचे भाव १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे गणेशोत्सव दरम्यान येणाऱ्या उपवासाच्या काळात वापरण्यात येणाऱ्या रानभाज्यांच्या किमतीत १० ते २० रुपयांनी वाढल्या आहेत. रानभाज्यांमध्ये माठ २० रुपये तर अळूच्या पानांच्या २० रुपयांना चार मिळणाऱ्या जुडय़ा मात्र आता २० रुपयांना दोन मिळत असल्याचे वसईतील भाजी विक्रेत्यांनी सांगितले. या रानभाज्या निर्मळ, कळंब, अर्नाळा, वसई गाव या भागांतून आणल्या जातात. भाज्यांबरोबर फळांच्या किमतीतही २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या बाजारात संत्री, मोसंबी, पपनिस यांच्या किमती या प्रत्येकी नगावर लावल्या जातात. बाजारात या फळांच्या प्रत्येक नगाची किंमत १० रुपयांनी वाढली आहे, तर सफरचंद, पेर, मोसंबी, डाळिंब हे किलो वर विकले जात असल्याने त्यांच्या किमतीमध्ये ४० रुपयांनी वाढ झाली असल्याचे निर्मळ येथील फळ विक्रेत्या स्नेहल पाटील यांनी सांगितले. सध्या गणेशोत्सवाच्या काळात मुख्यत: फळांना जास्त मागणी असते. त्यामुळे फळे लगेच विकली जातात आणि म्हणूनच यांच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याचेही त्या म्हणाल्या.
भाज्यांचे भाव
* रानभाज्या : चाकवत, टाकळा- आधी १० रुपये जुडी, आता १५ ते २० रुपये जुडी
* भोपळा, सुरण, रताळे, शिराळी : आधी १० रुपये पाव किलो, आता २० रुपये.
* संत्री, मोसंबी प्रत्येकी नगाची किंमत आधी १० रुपये होती, ती आता २० रुपये आहे. पपनिस हे फळ ८० रुपये प्रत्येक नग मिळत होते ते आता १०० रुपयांवर आले आहे.
* राजेळी केळींची आधी किंमत १५० रुपये डझन होती. आता २०० रुपये झाली आहे. वेलची केळी ८० रुपये, हिरवी केळी ५० रुपयांवर गेली आहेत.