बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कारवाई

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील ३०० हून अधिक देशी कोंबडय़ा आणि बदकांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी समोर आली होती. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शुक्रवारी सकाळी सात वाजेपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील २३ हजार ३८९ जिवंत कोंबडय़ा आणि सुमारे ३० बदके नष्ट केली. संबंधित फार्ममधील उर्वरित पक्षी खाद्य, अंडी नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या संसर्गाचा प्रसार कितपत झाला आहे हे पाहण्यासाठी बाधित क्षेत्राच्या १० किलोमीटर परिघातील कोंबडय़ांचे नमुने तपासण्याची मोहीम प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. 

वासिंद येथील वेहळोली गावातील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममधील देशी कोंबडय़ा आणि बदके गेल्या काही दिवसांपासून मृत्युमुखी पडत होत्या. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला माहिती दिली होती. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी फार्ममधील कोंबडय़ा आणि बदकांवर औषधोपचार सुरू केले होते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत कोंबडय़ांचे शवविच्छेदनाचे आणि जिवंत कोंबडय़ांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी ११ फेब्रुवारीला पाठविले होते. त्या अहवालातून त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे गुरुवारी निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर बधित क्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाच्या पथकाने परिघातील जिवंत कोंबडय़ा आणि बदके नष्ट केली आहेत. यामध्ये १५ हजार ४६७ ब्रॉयलर आणि ७ हजार ९२२ अंडी देणाऱ्या कोंबडय़ांचा समावेश आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या बर्ड फ्लू आजाराबाबतच्या नियमावलीनुसार बाधित क्षेत्राच्या १० किलोमीटर परिघातील सर्व फार्ममधील आणि नागरिकांनी घरी पाळलेल्या कोंबडय़ांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याद्वारे तेथील कोंबडय़ांचे नमुने दर पंधरा दिवसांनी तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती शहापूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दर्शन दळवी यांनी दिली. 

शहापूरमधील वेहळोली गाव वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना नाही. जिल्हा प्रशासनामार्फत संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

 – राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे</p>