झाड लावलेल्या प्रत्येक कुंडीत कंपोस्ट खत तयार करून आपण कुंडीतील मातीची गुणवत्ता वाढवू शकतो. कुंडी भरताना आपण कुंडीतील १/४ जागा मोकळी ठेवली होती, त्या जागेचा उपयोग आता आपण खत तयार करण्यासाठी करणार आहोत.
कंपोस्ट म्हणजे पालापाचोळा, फुलं, भाज्या किंवा फळे यांचा टाकाऊ भाग, इत्यादी पदार्थ कुजल्यानंतर तयार होणारी माती. यापुढे घरातील कोणताही वनस्पतीजन्य भाग टाकून न देता त्यापासून प्रत्येक घरी कंपोस्ट खत करणे अभिप्रेत आहे. त्यामुळे फेकला जाणारा कचरा प्रचंड प्रमाणात कमी होणार आहे. आतापर्यंत आपण याला ‘ओला कचरा’ म्हणत आलो. खरं तर हा ओला कचरा आपण पैसे देऊन विकतच आणला आहे. उदा. फळे, भाज्या यांच्या साली, देठं, बिया. खराब निघालेली भाजी उदा . किडकं वांग, भेंडी, खराब झालेली पालेभाजी इत्यादी. टाकाऊ म्हणून या सर्व गोष्टी टाकून न देता त्याचे योग्य रूपांतर करून पुन्हा त्या वापरात आणल्या पाहिजेत. आता या सर्व वनस्पतीजन्य टाकाऊ भागाला कचरा न म्हणता आपण ‘कम्पोस्टोपयोगी पदार्थ’ म्हणूया. तसेच इतर कम्पोस्टोपयोगी पदार्थ म्हणजे निर्माल्य अर्थात सुकलेली फुले, पाने, इत्यादी. याशिवाय पालापाचोळा, झाडाच्या कापलेल्या फांद्या यासुद्धा कम्पोस्टोपयोगी म्हणून वापरायच्या आहेत.

प्रत्येक कुंडीतील १/४ मोकळ्या जागेवर या कम्पोस्टोपयोगी पदार्थाचा एक पातळ थर द्यावा. त्यामुळे कुंडीतील माती आता दिसणार नाही. शक्य असल्यास कम्पोस्टोपयोगी पदार्थाचे बारीक तुकडे करावे, यामुळे ते लवकर कुजतात. समजा, एका दिवसांत जमा झालेले कम्पोस्टोपयोगी पदार्थ दोन कुंडय़ांमध्ये थर देऊन संपले, तर दुसऱ्या दिवशीचे कम्पोस्टोपयोगी पदार्थ दुसऱ्या दोन कुंडय़ांमध्ये घालावे. तिसऱ्या दिवशीचे पुढच्या दोन कुंडय़ांमध्ये घालावे. अशा प्रकारे सर्व कुंडय़ांमध्ये कम्पोस्टोपयोगी पदार्थ घातल्यावर पहिल्या कुंडीची पाळी येईल तेव्हा तिच्यातील कम्पोस्टोपयोगी पदार्थ खाली बसलेले असतील. तेव्हा परत पहिल्या कुंडीत कम्पोस्टोपयोगी पदार्थ घालावेत आणि हे चR तसेच पुढे चालू ठेवावे.

जेव्हा आपण कुंडीत कम्पोस्टोपयोगी पदार्थाचा पातळ थर देतो आणि त्यावर रोजच्या प्रमाणे सर्व बाजूंनी कुंडीला पाणी घालतो, तेव्हा हे पदार्थ कुजायला सुरुवात होते. कुजताना विविध बक्टेरिया, छोटे कीटक कुंडीत तयार होतात आणि कुंडीतल्या कुंडीतच कंपोस्ट तयार होते. त्यामुळे सुरुवातीला झाड लावताना मातीत कंपोस्ट मिसळलेलं नसलं तरी त्या मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस चांगली होत जाते. पावसाळ्यात प्रत्येक कुंडीत मुद्दाम एक-दोन गांडुळे टाकावीत. अशाप्रकारे कंपोस्ट तयार करत असतांना काहीही वास, घाण येत नाही. त्याबद्दल निश्चिंत असावे. यासाठीच पातळ थर देण्यास सांगितले आहे . एक गोष्ट नीट लक्ष देऊन बघितली पाहिजे, ती म्हणजे पाण्याचा निचरा लगेच झालाच पाहिजे. जर पाणी थोडा वेळ जरी कुंडीत साठून राहिलं तरी कम्पोस्टोपयोगी पदार्थ योग्य प्रकारे न कुजता त्याचा लगदा होईल आणि मग त्याला वास येऊ शकतो. पाण्याचा निचरा लगेच होत नसेल आणि कुंडीकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर कुंडी नीट करेपर्यंत त्या कुंडीला पाणी कमी घालावे, म्हणजे पाणी साठणार नाही.
प्रत्येक कुंडीत कंपोस्ट तयार केल्यामुळे मातीची गुणवत्ता चांगली राहाते. झाडाला वेगळे खत घालण्याची आवश्यकता राहत नाही. कुंडीत कंपोस्ट तयार होताना अनेक बक्टेरिआ, कीटक तसेच गांडुळे यांची वाढ प्रत्येक कुंडीत होते आणि त्यांच्या हालचालीमुळे माती आपोआपच भुसभुशीत रहाते. साहजिकच माती मुद्दाम उकरून मोकळी करावी लागत नाही.
अशाप्रकारे सर्व कुंडय़ांमध्ये कम्पोस्टोपयोगी पदार्थ घालूनसुद्धा जर घरात कम्पोस्टोपयोगी पदार्थ उरत असतील तर कंपोस्टसाठी वेगळी कुंडी करावी. फक्त खतासाठी वापरायच्या कुंडीत अर्थात खतकुंडीत खत कसे करायचे ते पुढच्या लेखात !
drnandini[dot]bondale[at]gmail[dot]com