डोंबिवली – डोंबिवलीत भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. दिवसाढवळ्या भटके श्वान पादचारी, शाळकरी विद्यार्थी, घरा शेजारी खेळणाऱ्या बालकांवर हल्ला करून त्यांना जखमी करत आहेत. मंगळवारी सकाळी डोंबिवली पश्चिमेतील बेबीबाई निवास शिवमंदिराजवळ मोठागाव रेतीबंदर रस्ता येथे पाच भटक्या श्वानांनी एका बालकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
डोंबिवलीत भटक्या श्वानांचा उपद्रव वाढत असताना पालिका आरोग्य विभागाकडून या श्वानांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान मोठागाव रेतीबंदर भागातील एका घरातील बालक खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. हे बालक रस्त्यावर येताच त्याच्या बाजुला काही अंतरावर पाच भटके श्वान उभे होते. हे भटके श्वान आपणास काही करणार नाहीत या विचाराने बालक आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत आले. त्यावेळी एका श्वानाने बालकाच्या दिशेने धाव घेऊन त्याच्या पायाला चावे घेण्यास सुरूवात केली. बालक जमिनीवर कोसळले. इतर चार भटके श्वान बालकाच्या दिशेने धाऊन आले. त्यांंनी जमिनीवर पडलेल्या बालकाच्या पायाला, हाताच्या भागाला चावे घेऊन त्याच्या विजारीला पकडून तोंडाने दोन ते तीन ठिकाणी फरफटत नेले.
बालक बचावासाठी ओरडा करत होते. तेथून जात असलेल्या एका पादचाऱ्याचा हा प्रकार निदर्शनास आला. त्याने तात्काळ जमिनीवर श्वानांच्या विळख्यात पडलेल्या बालकाच्या दिशेने धाव घेतली. श्वानांच्या दिशेने रस्त्यावरील दगडी फेकल्या, तेव्हा श्वान पळून गेले. तोपर्यंत बालक गंभीर जखमी झाला होता. त्याला उभे राहता येत नव्हते. या भागातील बेबीबाई निवासमधील रहिवासी अनिकेत शरद गायकवाड यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे. भटक्या श्वानांच्या या वाढत्या उपद्रवाचा पालिकेने बंदोबस्त करावा म्हणून याप्रकरणी पालिकेत रहिवाशांनी तक्रार केली आहे.
डोंबिवली पश्चिमेत उमेशनगर, महाराष्ट्रनगर, गोपीनाथ चौक, मोठागाव, कोपर भागात भटक्या श्वानांचा नागरिकांना सर्वाधिक उपद्रव आहे. डोंबिवली पूर्वेत बापूसाहेब फडके रस्त्यावर बापूसाहेब जोशी पथावरील एका अरुंद रस्त्यावर दोन भटके श्वान सतत नागरिकांचा पाठलाग करत असतात. अनेकांना यापूर्वी या श्वानांनी चावा घेतला आहे. रात्रीच्या वेळेत घरी परतणाऱ्या नोकरदारांना, रिक्षा चालकांना भटक्या श्वानांचा त्रास सहन करावा लागतो.
शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी, पालक अधिक संख्येने रस्त्याने जातात. त्यांना या भटक्या श्वानांचा सर्वाधिक उपद्रव आहे. पालिका आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य विभागाला या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.