डोंबिवली: डोंंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागात उल्हास नदी काठी महसूल विभागाने बुधवारी अचानक कारवाई केली. वाळू तस्करांची खाडी किनारी साठा करून ठेवलेली १२ लाख रूपयांची वाळू जेसीबीच्या साहाय्याने नदी पात्रात ढकलून दिली. वाळू तस्करांच्या किनारी उभ्या करून ठेवण्यात आलेल्या सामानाची, वाळू साठा हौदांची तोडमोड करण्यात आली.
कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना डोंबिवली पश्चिमेत मोठागाव ठाकुर्ली रेतीबंदर भागात उल्हास खाडी किनारी वाळू तस्करांनी वाळूचा साठा करून ठेवला असल्याची आणि ही वाळू ते विक्रीसाठी लवकरच उचलणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच तहसीलदार शेजाळ यांनी ही माहिती डोंबिवलीतील ठाकुर्ली विभागाचे मंडळ अधिकारी रवींद्र जमदारे आणि कल्याणचे मंडळ अधिकारी दीपक गायकवाड यांना दिली.दोन्ही मंडळ अधिकाऱ्यांनी मोठागाव खाडी किनारी येऊन वाळू साठ्याची खात्री केली. तेथे वाळू साठ्यासाठी बांधण्यात आलेल्या हौदांची पाहणी केली.
वाळू तस्करांनी वाळू उपसा करून साठा केल्याची खात्री पटल्यावर बुधवारी सकाळी मंडळ अधिकारी जमदरे, गायकवाड यांंनी ग्राम महसूल अधिकारी अरूण कासार, वैभव झापडे, भारती शेटे, हनुमंत जाधव, अश्विनी थोरात यांच्या साहाय्याने् खाडी किनारी भागात धडक मारली. सोबत जेसीबी, तोडकाम पथक आणि पोलीस बंदोबस्त होता.
खाडी किनारी भागात साठवण हौदांमध्ये २२ ब्रास रेती तस्करांनी साठा करून ठेवली होती, असे महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.महसूल विभागाच्या पथकाने वाळू तस्करांनी उल्हास खाडी किनारच्या भागात हौदांमध्ये साठवण करून ठेवलेली वाळू जेसीबीच्या साहाय्याने पुन्हा खाडीत ढकलून देण्याचे काम केले. अशाप्रकारे सुमारे १२ लाख रूपये किमतीची वाळू महसूल विभागाच्या पथकाने उल्हास खाडीत ढकलून दिली. त्यानंतर खाडी किनारी वाळू तस्करांनी वाळू साठा करून ठेवण्यासाठी तयार केलेले सीमेंट काँक्रीटचे साठा हौद जेसीबीच्या साहाय्याने नष्ट केले.
मागील वर्षभरात कल्याण, डोंबिवली महसूल विभागाने उल्हास नदी खाडी किनारी भागात वाळू तस्करांंवर कारवाई करून त्यांची लाखो रूपये किमतीच्या साहित्याची मोडतोड केली आहे. त्यांच्या बोटी, सक्शन पंप, बार्झ जाळून नष्ट करून टाकण्यात आले आहेत. काही सामग्री उल्हास खाडीत अवजड दगडी टाकून बुडवून टाकण्यात आली आहे. या सततच्या कारवाईमुळे उल्हास खाडी किनारी भागात वाळू तस्करांचा दिवस, रात्र असणारा वावर कमी झाला आहे.