ठाणे : मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. आमची शिवसेना हिंदुह्रदयसम्राटांची आहे, टोमणेसम्राटांची नाही, असा टोला त्यांनी लगावला. सांगली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील, सायगावचे उरसरपंच सागर वंजारी, सुरलीचे उपसरपंच कृष्णात भादणे, अमोल घोगे, सुशांत जाधव, संजय कांबळे, लक्ष्मण मंडळे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच मनसेचे मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, दिपाली सय्यद उपस्थित होते. या पक्षप्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

तीन वर्षांपूर्वी उठाव झाल्यानंतर आपल्यावर दररोज आरोप झाले, पण मुख्यमंत्री असताना आरोपातुन नाही तर कामातून उत्तर दिले. त्यामुळेच या कामांना महाराष्ट्रातील जनतेने प्रतिसाद दिल्याने महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या. ही शिवसेना हिंदुह्रदयसम्राटांची आहे, टोमणेसम्राटांची नाही, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. चंद्रहार पाटील हे नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आले आहेत. पैलवान पाटील हे कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. चंद्रहार पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. पैलवानांना डावपेच माहित असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री उदय सामंत यांनी बघितला आहे. चंद्रहार पाटील यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची आहे, असेही ते म्हणाले.
काश्मीरमध्ये रक्तदान शिबीर घेऊ

पहलगामध्ये आपल्या लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे काम पाकिस्तानने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला. सरकारची सात शिष्टमंडळे जगभरात गेली आणि त्यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. सीमेवरील जवानांसाठी दिल्लीत रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प चंद्रहार पाटील यांनी केला आहे. त्यांची देशभक्ती पाहता दिल्लीत काय काश्मीरमध्ये रक्तदान शिबीर घेऊ, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ज्या विश्वासाने तुम्ही शिवसेनेत आला आहात तुमची जबाबदारी वाढली आहे. घराघरात शिवसेना पोहोचवायची आहे, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलेला शब्द पाळतो म्हणून…

दिलेला शब्द पाळणारा जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा राजकारण- समाजकारण बदलते. जेव्हा उठाव झाला त्यानंतर राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आणले. दिलेला शब्द पाळतो आणि कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचे काम गेली अनेक वर्ष करतोय, त्यामुळे लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढतोय, असे शिंदे म्हणाले. अनिल बाबर हे सुरुवातीपासून सोबत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो तरी तिथे अनिल बाबर यांची माणसे आहेत. पूर्ण देश व्यापून टाकलेले अनिल बाबर आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांचे काम पुढे नेण्याचे काम आमदार सुहास बाबर करत आहेत, असे ते म्हणाले.