ठाणे : मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी, मेट्रो प्रकल्पाचे काम आणि त्यातच रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे घोडबंदरवासियांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असून या समस्येने अक्षरश: मेटाकुटीला आलेल्या घोडबंदरवासियांच्या समस्येसाठी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी आनंदनगर नाका येथे निषेध आंदोलन केले. वाहतूक कोंडीची समस्या सोडवली नाहीतर उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दिला.

घोडबंदर रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यासाठी खोदकामे करण्यात आली आहेत. यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अवेळी होणाऱ्या अवजड वाहतूकीमुळेही सकाळ आणि रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यातच रस्त्यावर खड्डे पडल्याने कोंडी वाढली आहे. अर्धा तासाच्या अंतरासाठी एक ते दिड तास लागत असून त्याचा फटका नोकरदार वर्गासह शाळेच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीच्या कामादरम्यान नवीन गटारांची बांधणी करून त्यावर पदपथ तयार करण्यात येत आहेत. परंतु अनेक ठिकाणी या गटारांवर झाकणे नाहीत. या उघड्या गटारात पडून नागरिक जखमी होण्याची भिती व्यक्त होत आहे.

वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. असे असतानाच, घोडबंदर वासियांना भेडसावणाऱ्या या समस्या सोडविण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी शुक्रवारी आनंदनगर नाका येथे आंदोलन केले. यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह भालचंद्र महाडिक, राजेश जाधव, प्रदीप राव हे उपस्थित होते. या आंदोलनाला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, धर्मराज्य पक्षाचे नेते राजन राजे यांच्यासह विविध संघटनांनी उपस्थित रहात पाठिंबा दिला.

गर्दीच्या वेळात बंदी असतानाही अवजड वाहनांना शहरात दिलेला प्रवेश, वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवक यांची कमतरता, शहरातील चालू असलेली बेकायदा प्रवासी वाहतूक, ट्रक टर्मिनस बस डेपो यासारख्या सुविधांचा अभाव, कंत्राटदाराकडून होणारे अटी शर्तींचे उल्लंघन, महापालिका आणि एम.एम आर.डी.ए यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव, या सर्व गोष्टी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. यामुळे मागील दहा ते पंधरा वर्षात अनेक लोकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने केलेले दुर्लक्ष आणि कामातील हलगर्जीपणा यामुळे ही कामे रखडली असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असे सांगत विक्रांत चव्हाण यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्यानंतर पाच तासानंतर निषेध आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु आजच्या आंदोलनातूनही प्रशासनाने सकारात्त्मक पावले उचलून योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.