ठाणे- दोन दिवसांपूर्वीच गावदेवी परिसरातून सायंकाळच्या वेळी घरी परतण्यासाठी रिक्षा उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांनी रस्ता रोको करत आंदोलन केले. असे असतानाच, शुक्रवारी सकाळी याच गावदेवी परिसरातून ठाणे शहरात कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांनी रिक्षाच्या शोधात रस्त्यावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. या ठिकाणी ठाणे शहराच्या लगत असलेल्या विविध शहरातून तसेच मुंबईतून अनेक नोकरदार नोकरीसाठी येत असतात येत असतात. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच ठाणे स्थानक परिसरात नागरिकांचा गजबजाट पाहायला मिळतो.

वागळी स्टेट भागात जाण्यासाठी ठाणे सॅटिस पुलावरून ठाणे परिवहन विभागाच्या बस सोडल्या जातात तसेच गावदेवी परिसरातील बी केबिन येथून वागळे इस्टेट भागात जाण्यासाठी शेअर रिक्षा उपलब्ध असतात. बसेसची संख्या अपुरी पडत असल्यामुळे अनेक प्रवासी रिक्षाच्या शोधात गावदेवी परिसरात येतात. परंतु, सकाळच्या सुमारास या भागातून प्रवाशांना शेअर रिक्षा मिळण्यास वेळ लागतो. कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी नागरिकांची रिक्षा शोधण्यासाठी धडपड सुरू असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी सकाळी असेच चित्र ठाणे स्थानक जवळील गावदेवी परिसरात पाहायला मिळाले. प्रवासी रिक्षाच्या शोधात रस्त्यावर गर्दी करून उभे होते. दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी घरी परतण्यासाठी रिक्षा उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त करत रस्ता अडविण्यात आला होता. यावरून रिक्षाचालकांचा मुजोरीपणा दिसून आला होता. परंतु, या रस्ता रोको नंतर तरी रिक्षा चालकांना जाग आली असेल असे प्रवाशांना वाटले होते. मात्र प्रवाशांच्या या आशेवर पाणी फिरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे स्थानक परिसरात रिक्षा मिळवताना प्रवाशांना इतका त्रास होत असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच होत असल्याची खंत प्रवासी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.