कल्याण – कल्याण पूर्वेतून उल्हासनगर शहरात जाण्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या उड्डाण पुलाचा कठड्या जवळचा भाग गुरुवार खचला आहे. दुर्घटना टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम विभागाने हा पूल दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.
कल्याण पूर्व भागातून उल्हासनगर शहराकडे जाताना मंगेशी गार्डन गृहसंकुल भागातील उड्डाण पूल खचल्याची माहिती मिळाल्यावर कल्याण डोंबिवली पालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, कल्याण पूर्व ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर, वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पुलाच्या कठड्याजवळचा भाग खचला असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
या पुलावरून सतत वाहतूक सुरू राहिली तर खचलेल्या भागावर भार येऊन तो भाग कोसळले. त्या ठिकाणी भगदाड पडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या पुलावरील वाहतूक दुर्घटना टाळण्यासाठी पूल बंद ठेवण्याचा निर्णय पालिका, वाहतूक अधिकाऱ्यांनी घेतला.
ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी सांगितले, पुलाच्या खचलेल्या भागाखालून बाजुला असलेल्या एका गॅस कंपनीची वाहिनी गेली आहे. त्यामुळे याठिकाणी तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेता येत नाही. कंपनी अधिकाऱ्यांशी बोलून बांधकाम विभागाचे अधिकारी हे काम समन्वयाने हाती घेतील. तोपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलाच्या खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण होईल यादृष्टीने पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.
कल्याण पूर्व भागातून उल्हासनगर शहरात जाण्यासाठी हा पूल मधला आणि जवळचा मार्ग होता. कल्याण पूर्व, पश्चिमेत, उल्हासनगर परिसरात वाहतूक कोंडी झाली की अनेक वाहन चालक पर्यायी मार्ग म्हणून या पुलाचा वापर करतात. या पूल बंदचा शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बसना सर्वाधिक फटका बसला आहे. या मार्गाने धावणाऱ्या शालेय बस चालकांना वळसा घेऊन विद्यार्थ्यांना घराजवळून घेणे आणि शाळेत सोडण्यासाठी जावे लागते.