कल्याण – मयत झालेल्या व्यक्तीच्या नावे असलेल्या व्यापारी गाळ्याची बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे नोंदणीकृत न करता या गाळ्याचा विक्री व्यवहार बेमालूमपणे करण्यात आली. या गाळ्याला मालमत्ता कर लावताना पालिकेच्या तत्कालीन ड प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी खातरजमा न करता या गाळ्याला कर लावला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीच्या वारसाने तक्रार केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला आहे.

या फसवणूक प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी ड प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त आणि माजी परिवहन लेखाधिकारी शांतिलाल राठोड, कल्याणचे सह दुय्यम निबंधक पी. एस. केळकर, पालिकेचे तत्कालीन कर अधीक्षक, दोन लिपीक, चंद्रकांत बनकर, अरूण पवार, मनीषा पवार आणि बनावट दस्तऐवज प्रकरणातील साक्षीदार सुकेत शहा यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मयत व्यक्तिचा वारस नातेवाईक टिटवाळा जवळील कोंढेरी गावचे विक्रम प्रकाश बनकर यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे.

हेही वाचा…डोंबिवलीत स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमधील २१ लाख रुपये जळून खाक

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार विक्रम बनकर यांच्या आजोबांच्या नावे कल्याण पूर्व येथील रुक्मिणी देवी सोसायटीत एका व्यापारी गाळा आहे. या गाळ्याची पालिकेच्या मालमत्ता कर विभागात करदाता म्हणून नोंद आहे. आरोपी चंद्रकांत नामदेव बनकर यांनी गाळा हडप करण्याच्या उद्देशाने मयत इसमाच्या नावे बनावट कुलमखत्यार पत्र तयार केले. हा दस्तऐवज सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत न करता तो गाळा आपल्या मालकीचा आहे असे दाखवून अरूण पवार, पत्नी मनीषा पवार या दोन व्यक्तिंच्या नावे हस्तांतरित केला. या प्रकरणाची पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयात मालमत्ता विभागात साहाय्यक आयुक्तांच्या आदेशावरून मालमत्ता कर कर्मचाऱ्यांनी नोंद करून घेतली.

महापालिका कायद्यातील कराधान विषयानुसार मालमत्ता कर हस्तांतरणासाठी कुल मुख्यत्यार पत्र, बक्षिसपात्र हे दस्त नोंदणीकृत नसतील, त्यांनी मुद्रांक शुल्क पालिकेला भरणा केले नसेल तर ती कागदपत्रे मालमत्ता कर लावण्यासाठी ग्राह्य धरण्याचा अधिकार पालिकेला नाही. हे माहिती असुनही तत्कालीन साहाय्यक आयुक्त शांतीलाल राठोड, इतर कर विभाग कर्मचाऱ्यांनी आरोपीशी संगनमत करून बनावट कागदपत्रांची कोणतीही छाननी न करता ही कागदपत्रे वैध आहेत असे ठरवून बनावट कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरित गाळ्याला कर लावला. नियमबाह्य हस्तांतरित केलेल्या गाळ्याला पालिकेने कर लावला.

हेही वाचा…दिवा पाणीटंचाईला जबाबदार असणाऱ्या शिंदे गटाला पाण्यात बुडवा – उद्धव ठाकरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००१ पासून बेकायदा गाळ्याचा ताबा घेणाऱ्यांना कराच्या पावत्या दिल्या. आपण मयत आजोबांचे वारस असुनही आपणास अंधारात ठेऊन हा सगळा प्रकार केल्याबद्दल वारस विक्रम बनकर यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक यु. व्ही जाधव तपास करत आहेत.