कल्याण येथील आधारवाडी कचराभूमीला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. धुराचे लोट शहराच्या दिशेने आल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते. आग लागल्यानंतर जोरदार वारे सुटल्याने आगीने उग्र रूप धारण केले. उन्हाने तप्त झालेला कचरा आणि त्यात आग लागल्याने आगीच्या ज्वाला २० ते २५ फूट उंच जात होत्या. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम करत आहेत. जोरदार वारे आणि आगीने धारण केलेले उग्र रूप त्यामुळे जवानांची आग विझवताना दमछाक होत आहे. काही दिवसापूर्वीच आधारवाडी कचरा भूमीला रात्रीच्या वेळेस भीषण आग लागली होती. विविध प्रकारचा कचरा आधारवाडी कचरा भूमीवर असल्याने. दिवसा हा कचरा तप्त होऊन त्यामधून मिथेन वायू तयार होतो. त्यामुळे आगी लागतात असा निष्कर्ष यापूर्वीच तज्ज्ञांनी काढला आहे.