कल्याण: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सकाळच्या वेळेत अमरावतीहून आलेला एका प्रवासी चहा कोठे मिळतो का, याचा तपास करत होता. यावेळी एक महिला या प्रवाशाच्या समोर आली. तिने काही कारण नसताना प्रवाशाच्या कानशिलात मारली. ती निघून गेल्यावर, तेथे तीन जण प्रवाशाजवळ आले. त्यांनी तिघांनी मिळून प्रवाशाला बेदम मारहाण करत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्याजवळील मोबाईलसह ३५ हजाराचा ऐवज हिसकावून नेला.
पोलिसांनी मागील पाच महिन्याच्या काळात कल्याण रेल्वे स्थानकाजवळील दिवसा, रात्रीची गुंडगिरी मोडून काढली आहे. तरीही काही गुन्हेगार कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात वावरत असल्याचे या घटनेने उघड झाले आहे. शुभम राजेंद्र भोयर (२९) असे मारहाण आणि हल्ला झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते सुरक्षा रक्षक आहेत. ते मुळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
शुभम भोयर हे सकाळीच काही कामानिमित्त कल्याण येथे आले होते. सकाळी सहा वाजता कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर ते कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर कोठे टपरी, हाटेलमध्ये चहा पिण्यास मिळतो का म्हणून तपास घेत होते. कुठेही चहाची टपरी, हाॅटेल त्यांना उघडे दिसले नाही. म्हणून ते रेल्वे स्थानकाजवळील संतोष हाॅटेलजवळील पानाच्या टपरीजवळ उभे होते.
यावेळी एक अनोळखी महिला शुभम भोयर यांच्या जवळ आली. तिने काही कळण्याच्या आत शुभम यांच्या कानशिलात मारली. आपणास का मारले, असा प्रश्न भोयर यांनी महिलेला करताच,तेथे तीन पुरूष इसम आले. त्यांनी दादागिरी करत शुभम यांना घेरले. त्यांच्या हातात बोथट हत्यार होते. त्यांनी शुभम यांच्याकडे रागाने पाहत त्यांच्या चेहऱ्यावर वार केले.अचानक हल्ला झाल्याने शुभम घाबरले. ते या चौघांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिन्ही इसमांनी शुभमला जमिनीवर पाडले. त्यांना बेदम मारहाण केली.या मारहाणीच्यावेळी तिघांनी मिळून शुभमच्या विजारीमधील मोबाईल काढून घेतला. त्यांच्या जवळील पाच हजाराची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. शुभमने बचावासाठी ओरडा केला, पण कोणीही पादचारी पुढे आला नाही.
शुभमला मारहाण करून त्यांच्या जवळील ३५ हजाराचा ऐवज हिसकावून तिन्ही चोरटे आणि संबंधित महिला दोन दुचाकीवरून पळून गेले. शुभम भोयर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक मडके तपास करत आहेत.