नवी मुंबई : नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा खारघर किनारा प्रस्तावित मार्गिकाच्या प्रकल्पाच्या निर्माणास वन विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर २०२६ मध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी असलेल्या या प्रकल्पामुळे खारघर, नेरुळ आणि बेलापूर भागातील वाहतुक सुलभ होणार आहे. हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक होणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. तसेच शीव-पनवेल मार्गावरही मोठ्याप्रमाणात वाहनांचा भार असतो. वाहतुक कोंडीमुळे सुटका मिळावी यासाठी खारघर किनारी प्रकल्प सिडकोच्या माध्यमातून निर्माण केला जाणार आहे. हा मार्ग ९.६८ किमी लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा असेल. मार्ग खारघर आणि नेरुळ भागाला जोडला जाणार आहे.
खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ पासून खारघर रेल्वे स्थानकाजवळील पीएमएवाय गृहनिर्माण योजनेर्पंत तसेच नेरुळमधील भुमिगत मार्गापर्यंत हा प्रकल्प विस्तारित केला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शीव पनवेल मार्गावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. २०२६ मध्ये सुरुवातीच्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या निर्माणास सुरुवात होणार असून २०२९ मध्य प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. विमानतळाच्या निर्मितीमुळे भविष्यात रस्ते मार्गावरही वाहनांचा भार वाढणार आहे. त्यामुळे या विमानतळाला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हा मार्ग सहा वाहिन्यांचा असेल. त्यामुळे भविष्यातील या मार्गावरील प्रवास वेगवान असेल. ९.६८ किमी लांबीचा असून त्यापैकी ६.६९ किमीची मार्गिका पूर्णपणे नव्याने बांधली जाणार आहे. तर २.९९ किमी मार्गिकाही पूर्वीच्याच मार्गिकेत दुरुस्ती करून ती या प्रकल्पाला जोडली जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या आर्थिक घडीला देखील चालना मिळणार आहे.
