कल्याण : ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील डोळखांब या सह्याद्री डोंगर रांगेच्या परिसरातील डेहणे, गुंडे गाव परिसरातील जंगलामध्ये दोन दिवसांपासून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याचा वावर आढळून आला आहे. डोळखांब परिसरातील बहुतांशी गावे, आदिवासी पाडे डोंंगर रांगांच्या पायथ्याशी घनदाट जंगलात आहेत. बिबट्यापासून नागरिकांनी स्वसंरक्षण कसे करावे. पशुधनाची सुरक्षितता कशी घ्यावी, याविषयी डोळखांब वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावे, आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

ठाणे जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून डोळखांब परिसर ओळखला जातो. त्याच्या बाजुला अकोला, भंडारदरा, घाटघर प्रकल्प आणि या डोंगर रांगांच्या पलीकडे अहिल्याबाई नगर जिल्ह्याची हद्द लागते. डोळखांब भागात डेहणे गाव हद्दीत आज्या डोंगर रांगांमध्ये वाल्मिक ऋषींच्या समाधीचे स्थान, लवं-कुश यांच्या पाळण्यांचे ठिकाण असल्याचे सांगण्यात येते. अनेक पर्यटक, भक्तगणांची या भागात नियमित वर्दळ असते.

डोळखांब वन विभागाचे अधिकारी नेहमीप्रमाणे गुंडे, डेहणे भागात वन परिक्षेत्रात गस्त घालत होते. त्यांना या भागात वन विभागाकडून लावण्यात आलेल्या जंगली प्राणी खेचक (ट्रॅप) कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याच्या हालचाली दिसून आल्या. गुंडे, डेहणे हद्दीत बिबट्याचा संचार असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी तातडीने डोळखांब वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांना दिली. पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू झाली आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांची शेती जंगल भागात आहे. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन दिवसा जंगल भागात चरायला नेले जाते. या सर्व बाबींचा विचार करून डोळखांब वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डोळखांंब परिसरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, गाव पाडे हद्दीत बिबट्यापासून सावध राहण्याचे फलक लावले आहेत. गाव, आदिवासी पाड्यांंमध्ये वन कर्मचारी जाऊन ग्रामस्थांना एकत्रित करून बिबट्याचा वावर परिसरात असल्याने घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती ग्रामस्थांना देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जंगलातील शेतावर जाताना शेतकऱ्यांनी गट करून जावे. संध्याकाळी उशिरापर्यंत जंगलात थांबू नका. पशुधन जंगलात न नेता मोकळ्या रानावर चरण्यासाठी न्यावे. रात्रीच्या वेळेत घराबाहेर पडू नका. ज्याठिकाणी गाई, म्हशी, बैल पशुधन बांधून ठेवले आहे. त्या गोठ्याचा दरवाजा बंदिस्त करून घ्यावा. रात्रीच्या वेळेत गावातील श्वान भुंकू लागल्यानंतर तात्काळ बाहेर येऊ नका. उशिरा रात्रीचा दुचाकी वाहनावरील, पायी प्रवास टाळा, अशी माहिती वन कर्मचारी ग्रामस्थांना देत आहेत. एप्रिल २०२२ मध्ये डोळखांंब भागातील रानविहिर गावहद्दीत बिबट्या संचार होता. यावेळी रानविहिरच्या जंगलात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेळ्यांवर आणि शेळी पालक किसन काळुराम खाकर (२६) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. शेळी पालक बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. दोन शेळ्यांना फरफटत नेत बिबट्याने त्यांना फस्त केले होते. शेळी पालकाच्या ४० पैकी नऊ शेळया जंगला बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे बिबट्याने त्यांना फस्त केले असण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला होता.