कल्याण – दाट धुक्याची चादर तयार झाल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील कसारा, खोपोली, कर्जत ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकल सोमवारी सकाळी अर्धा तास उशिराने धावत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. लोकल चालविताना मोटरमनला पाच फुटाच्या पलीकडील दिसत नाही. त्यामुळे दर्शनी भागातील प्रखर झोत दिवे लावून भोंगा वाजवत मोटरमन संथगतीने लोकल चालवित असल्याचे दृश्य आहे.

मध्यरात्रीपासून दाट धुके पडण्यास सुरुवात झाली. सकाळच्या वेळेत हे धुके ओसरेल असे वाटले असतानाच, सकाळचे आठ वाजून गेले तरी धुक्याची चादर कायम होती. शहरांमधील इमारती धुक्यात गायब झाल्या होत्या. पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक धुक्याचा आनंद घेत होते. शाळकरी मुले पालकांसोबत धुक्यातून वाट काढत शाळेत जात होती.

हेही वाचा >>>ठाणे : वृद्धेची कोट्यवधी रुपयांना फसवणूक

सोमवार कामावर जाण्याचा पहिला दिवस असल्याने कार्यालयात वेळेत पोहचू या विचाराने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, कसारा, कर्जत, आसनगाव, मुंब्रा, अंबरनाथ, बदलापूर रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांचा हिरमोड झाला. नेहमीच्या निश्चित वेळेपेक्षा लोकल धुक्यामुळे अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकात येणारी मिळेल ती लोकल पकडून नोकरदार वर्ग मुंबईच्या दिशेने प्रवास करत होता. लोकल उशिरा धावत असल्याने रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांच गर्दी उसळली होती.

मुंबईकडून कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल संथगती धावत होत्या. लोकलच्या दरवाजात उभे राहून अनेक प्रवासी धुक्याच्या चादरीमध्ये लपेटून जाण्याचा आनंद घेत होते.

हेही वाचा >>>गणेश मुर्ती मोडतोडीनंतर भिवंडीत तणाव

मेल, एक्सप्रेस गाड्यांचा वेग धुक्यामुळे कमी झाल्याने या गाड्या खडवली, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात मुख्य रेल्वे मार्गाजवळील बाजुच्या रेल्वे मार्गात उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. डोंगर, दरी असलेल्या कसारा, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव, खर्डी परिसरात धुक्याचा प्रभाव सर्वाधिक होता. दाट धुक्यामुळे लोकल उशिराने धावत असल्याच्या सूचना प्रत्येक रेल्वे स्थानकात देण्यात येत होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साडे आठ वाजल्यानंतर धुक्याची चादर कमी होऊ लागली. त्यानंतर रेल्वे स्थानकात लोकल निश्चित वेळेत धावत असल्याच्या वेळ इंडिकेटरवर लावण्यात येऊ लागल्या. तरीही या लोकल पाच ते दहा मिनिटे उशिरानेच धावत होत्या.