कल्याण – कल्याण जवळील मामणोली गाव हद्दीत मुरबाड तालुक्यातील शेळकेपाडा येथील एका आंबा विक्रेत्याला मारहाण करून त्याच्या जवळील दहा हजार रूपये जबरदस्तीने हिसकावून पळून जाणाऱ्या कुंदा, रायता, मामणोली गावातील तीन इसमांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. रवी शेलार (राहणार कुंदा), बाळा उर्फ योगेश शिरोसे (रा. रायता), चिन्मय सुनील भरणुके (३४, रा. मामणोली) अशी गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत. हृतिक सुरेश गायकर (२४) असे मुरबाड शेळकेपाडा येथील आंबा विक्रेत्याचे नाव आहे. हृतिक यांच्या गावातील मालकीत आंब्याची झाडे आहेत. झाडाला आलेले आंबे अढीमध्ये पिकवून त्यांनी हे आंबे विक्रीसाठी कल्याण मुरबाड रस्त्यावरील बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मामणोली गाव हद्दीत शनिवारी संध्याकाळी विक्री करण्यासाठी आणले होते. शेतकरी गायकर यांनी आंंब्यांसाठी रस्त्याच्या कडेला एक मंच उभा करून त्यावर आंबे विक्रीसाठी ठेवले होते.
रविवारी दुपारी हृतिक गायकर आंबा विक्रीसाठी आपल्या दुकानात बसले होते. त्यावेळी दुपारच्या वेळेत एकूण चार इसम एका मोटारीतून गायकर यांच्या आंबा विक्री मंचाजवळ आले. ते आंबे खरेदीसाठी आले असावेत म्हणून गायकर यांनी त्यांचे स्वागत केले. परंतु, चारही इसमांनी त्यांच्या स्वागताकडे दुर्लक्ष करत थेट गायकर यांना शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरूवात केली. ही आमची हद्द आहे. येथे तू आंबा विक्री करायचा नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर चारही जणांनी आंबा विक्रेते यांना कोणतेही कारण नसताना मारहाण केली. त्यांचा सदरा फाडण्यात आला. मारहाण करत असताना चारही इसमांनी गायकर यांच्या विजारीतील खिशात असलेली दहा हजार रूपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन पळ काढला.
गायकर यांनी घडल्या घटनेची टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ तपास करून तीन इसमांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित दोरकर तपास करत आहेत.