लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधून डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारी भागात पर्यावरण दक्षता मंडळ, विक्रोळी येथील गोदरेज मॅनग्रोव्हज आणि बिर्ला महाविद्यालयातीलय विद्यार्थी यांच्या सहकार्याने खारफुटीच्या रोपांची लागवड करण्यात आली.

मागील काही वर्षापासून पर्यावरण दक्षता मंडळातर्फे हा उपक्रम देवीचापाडा खाडी किनारी, सातपूल भागात राबविण्यात येतो. या उपक्रमात कल्याण डोंबिवली पालिकेचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते, गावदेवी विभागाचे पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर, देवीचापाडा ग्रामस्थ सहभागी झाले होते. बिर्ला महाविद्यालयाचे ८६ विद्यार्थी, शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. विद्यार्थी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत ही लागवड करण्यात आली.

हेही वाचा… कल्याणचे वाद्ग्रस्त सहदुय्यम निबंधक गोरखनाथ सातदिवे यांची विभागीय चौकशी, कठोर कारवाईचा नोंदणी महानिरीक्षक विभागाचा निर्णय

खाडीला ओहटी लागताच मंडळाचे कार्यकर्ते, बिर्ला महाविद्यालयाचे विद्यार्थी बोटीत बसून खाडी किनारच्या दलदलीच्या भागात बोटीतून खारफुटीची रोपे घेऊन गेले. बोटीतून बांबूच्या साहाय्याने दलदलीत खड्डे तयार करुन त्यात रोपांची लागवड केली. ३० हून अधिक विविध प्रकारची खारफुटीची रोपे लावण्यात आली. मागील काही वर्षापूर्वी या भागात लावण्यात आलेली खारफुटीची रोप बहरली आहेत.

हेही वाचा… डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक प्रवेशव्दाराला रिक्षांचा विळखा

खारफुटीच्या जंगलामुळे नैसर्गिक जैवविविधता वाढण्यास मदत होते. जलचर प्राण्यांचा अधिवास खारफुटीच्या झाडांच्या मुळाशी असतो. अनेक पक्ष्यांची घरटी खारफुटीच्या झाडावर असतात. विविध प्रकारचे पक्षी या झाडांवर अधिवास करतात. ही वनस्पती कार्बन डायऑक्सईड अधिक प्रमाणात सेवन करते. त्यामुळे वायू प्रदूषण टाळण्यात ही वनस्पती महत्वाची भूमिका बजावते, असे विक्रोळी येथील गोदरेज मॅनग्रोव्हजचे प्रमुख आणि खारफुटी तज्ज्ञ हेमंत कारखानीस यांनी सांगितले.

हेही वाचा… “शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी आली पण…”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान

पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी निसर्गप्रेमी मंडळींकडून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. अधिकाधिक खारफुटीचे संवर्धन या भागात होईल यादृष्टीने ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत, असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी खारफुटीचे महत्व आणि संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गावदेवी महसूल विभागाचे तलाठी मनोज अडमाने, सुभाष रसाळ यावेळी उपस्थित होते.