ठाणे : कोणताही राजकीय फायदा व्हावा किंवा त्यांना कोणत्या विशिष्ट शब्दाने बोलावे, यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मातेचे मंदीर उभारलेले नाही, असे सांगत या मंदिर उभारणी मागचा किस्सा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना मांडला. जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी सिद्धीविनायक मंदिरात जायचे तर, मनात काही इच्छा असेल तर तुळजापुरला जायचे, याचा मी साक्षीदार असून त्यांनी लहानपणाच्या भावेनेतून हे मंदिर उभारले आहे, असे ते म्हणाले. ठाण्यातील हे पहिले अधिकृत मंदिर असून आता मी सुद्धा समतानगर येथे अशाचप्रकारचे मंदिर बनविणार असल्याचे ते म्हणाले.

ठाण्याच्या पाचपखाडी भागातील गणेशवाडी येथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून या मंदिरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आली. याठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही उपस्थिती लावून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आवठणींना उजाळा दिला. जितेंद्र आव्हाड यांनी हे सुंदर मंदीर बनवले आहे. ⁠या मंदीरांच्या माध्यमातून राजकीय फायदा व्हावा किंवा त्यांना कोणत्या विशिष्ट शब्दाने बोलावे यासाठी त्यांनी हे मंदिर उभारलेले नाही. जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी सिद्धीविनायक मंदिरात जायचे तर, मनात काही इच्छा असेल तर तुळजापुरला जायचे, याचा मी आणि मनोज प्रधान साक्षीदार आहे. आम्ही अनेकदा एकत्रित कुटुंबासमवेत तुळजापुरला गेलो आहे. त्यांच्या लहानपणाच्या भावनेतून त्यांनी हे मंदिर उभारलेले आहे, असे सरनाईक म्हणाले.

मला सर्वोच्च पद मिळाले पण…

मी जितेंद्र आव्हाड यांना ३५ वर्षांपासून ओळखतो. ते सिद्धी विनायक आणि दादरमधील एका मंदीरात जातात. तसेच त्यांच्या मनात इच्छा असेल तर, ते तुळजापुरला जातात. या मंदीरातील चिंतामणी दगडावर हात ठेवून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेक इच्छा मागितल्या होत्या आणि त्यांच्या सर्व इ्च्छा पुर्ण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे मी सुद्धा इच्छा मागितली होती. आपली ही इच्छा पूर्ण झाली आहे, असे सरनाईक म्हणाले. मला सर्वोच्च पद मिळाले पण, आव्हाड यांच्या काही इच्छा असतील तर मित्र म्हणुन मी देवीकडे मागेन, असेही त्यांनी सांगितले. तसेच महायुती म्हणुन जे काम आम्ही करतोय त्यांना त्यांचा पाठिंबा कायम असेल असेही सरनाईक म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैत्री अबाधित राहू दे

जितेंद्र आव्हाड आणि माझा पक्ष जरी वेगळा असला तरी आमची मैत्री अबाधित राहू दे, असेच मागणे तुळजाभवानी देवीकडे मागितले आहे. आम्ही दोघांनी आमचे कौटुंबिक संबंध गेले ४० वर्षे जपले आहेत. मी आणि जितेंद्र आव्हाड जवळपास नऊ वर्षे बोलत नव्हतो. पण आमचे कौटुंबिक संबंध आणि घरची नाती मात्र कायम ठेवले होते. तेच आयुष्यभर राहू दे, अशी तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो, असेही सरनाईक म्हणाले.