भाईंदर : करोनामुळे थंड पडलेल्या पालिकेच्या उत्पन्नाला पूर्वपदावर आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात ८५ कोटी ७० लाख कर वसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. विशेष बाब म्हणजे यंदा डिसेंबर महिन्यात प्राप्त झालेली करवसुलीचा आकडा हा गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर शहरात सुमारे ३ लाख ४२ हजार मालमत्ता असून त्यात निवासी मालमत्तांची संख्या २ लाख ८७ हजार तर व्यावसायिक मालमत्तांची संख्या ५५ हजार इतकी आहे. पालिकेने सन २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षांत मालमत्ता करापोटी २७१ कोटींचे उत्पन्न निश्चित केले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून देशभरात करोनाच्या टाळेबंदी नियमामुळे पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. पालिकेच्या उत्पन्नातील महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली करोनामुळे रखडल्यामुळे पालिकेकडून ऑनलाइन कर भरणी प्रक्रिया राबवण्यात आली.

मात्र ही वसुली एकूण उद्दिष्टांपैकी केवळ ०.५५ टक्के इतकीच ठरल्याने पालिकेने ऑगस्ट महिन्याच्या माध्यान्हात कराची देयके वाटण्यास तसेच थेट कर वसूलीला सुरूवात केली आहे. करवसुली उत्पनावर पालिका प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबवण्यात आल्याने सप्टेंबपर्यंत  झालेल्या २५ कोटी कर वसुलीत वाढ होऊन त्यात दोन महिन्यात ६० कोटीची वाढ होऊन तब्बल एकूण ८५ कोटी ७० लाख  रुपयाची कर वसुली झाली आहे.