ठाणे : मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत राज्य सरकारने उतरवावेत अन्यथा मशिदींसमोर ध्वनिक्षेपकावर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंब्रा-कौसा येथील महत्त्वाच्या जामा मशिदीसमोर सकाळी ६, दुपारी १, सायंकाळी ५ आणि रात्री ८ या वेळेत ध्वनिक्षेपकावर हनुमान चालीसा लावण्यासाठी ठाणे पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात मशिदींवरील भोंग्यांवरून संपूर्ण राज्याचे राजकारण तापले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर ध्वनिक्षेपकावर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ३ मे रोजी कौसा येथील जामा मशिदीसमोर ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी मागितली आहे. त्यासाठी त्यांनी मुंब्रा पोलिसांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले आहे. सकाळी ६, दुपारी १, सायंकाळी ५ आणि रात्री ८ या कालावधीत या ध्वनिक्षेपकावर हनुमान चालीसा लावण्याची परवानगी मिळावी असे त्यात म्हटले आहे. या पत्रामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुस्लीम धर्मगुरूंचे आवाहन
मुंब्रा येथे काही मुस्लीम धर्मगुरूंनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. शासनाने कायदा सुव्यवस्था राखावी. मुंब्य्रातील नागरिकांनी शांतता पाळवी, असे आवाहन मुंब्य्रातील नागरिकांना केले आहे.