पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे ग्रामीण भागातील लोकांकरिता पर्वणीच. अनेक रानभाज्या सध्या आदिवासी बांधवांकडून वसईच्या बाजारात उपलब्ध होत असल्या तरी वसईतील ग्रामीण भागात वाडी आणि शेतीमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अळंबीला (मशरूम) वसईच्या बाजारात सध्या मोठी मागणी आहे. वसईच्या बाजारात अळंबीला दर्जानुसार ८० ते १०० रुपये किलो असा दर मिळत आहे.

ऊन-पावसाच्या खेळात ही अळंबी उगवते. गेल्या दोन दिवसांपासून ऊन पडत असल्याने वसईच्या ग्रामीण भागातील लोक रानावनात फिरून अळंबी गोळा करत आहेत. वसईच्या काही भागांत अशा स्वरूपाची अळंबी सध्या मोठय़ा प्रमाणावर पाहावयास मिळत आहे. याला काही ठिकाणी ‘कुत्र्याची छत्री’ म्हणतात. नैसर्गिकरीत्या आपोआप उगवणाऱ्या आणि एका दिवसात नष्ट होणाऱ्या या अळंबीची बाजारात विक्री करण्यात येते. त्यामुळे एका विशिष्ट वेळेला आणि ठरावीक काळापुरतेच रानात उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी आहे. पांढऱ्याशुभ्र छत्रीच्या आकाराच्या अळंबी काळ्या मातीत उठून दिसतात. अळंबी जमवण्याकरिता वसईच्या ग्रामीण भागात मोठी कसरतच असते. ज्या ठिकाणी अळंबी मोठय़ा प्रमाणात उगवतात, तेथून अळंबी आणण्यासाठी पहाटेपासून लोकांची चढाओढ सुरू असते. पहाटे उठून अनेक जण अळंबीसाठी रानात जातात. मुख्यत: निर्मळ, भुईगाव, नायगाव, उमेळा, गिरीज, बोळिंज, आगाशी या भागात तर ग्रामीण भागात अळंबी आढळून येत आहेत.

नैसर्गिक सत्त्व आणि जीवनसत्त्वांनी पुरेपूर असलेली ही अळंबी ग्रामीण भागासह शहरी भागातही चवीने खाल्ली जाते.

  • अळंबीमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रथिने, फॉलिक अ‍ॅसिड यांचे प्रमाण असते.
  • अळंबीच्या पौष्टिक गुणधर्मामुळे अळंबीला अधिक दर आहे.
  • सध्या अळंबीस किमान ८० ते १०० रुपये किलो दर मिळत असल्याचे वसईतील अळंबी विक्रेत्यांनी सांगितले.