किशोर कोकणे

ठाणे : ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ठाणे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी अनेक चालक दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखवित असल्याने ही रक्कम ४७ कोटींच्या घरात गेली आहे. या वाहन चालकांनी थकित दंडाची रक्कम भरावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिसांनी मदत केंद्र सुरू केले असून हे मदत केंद्र दोन दिवस म्हणजेच ९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. या कालावधीत थकित दंड भरण्याची तयारी असलेल्या वाहन चालकांचे सुमारे ४० ते ५० टक्के दंड माफ करण्यात येणार आहे. सुरूवातीला ही मोहीम ठाणे ते दिवा शहरातील वाहन चालकांसाठी असेल.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना यापुर्वी दंडाच्या रक्कमेची पावती देऊन त्यांच्याकडून दंडाची रक्कम तात्काळ वसुल केली जात होती. परंतु या प्रक्रीयेदरम्यान वाहन चालकांचा वेळ वाया जात होता. शिवाय, या प्रक्रीयेत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप पोलिसांवर होत होते. कारवाईदरम्यान, पोलीस आणि वाहन चालक यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवत होते. त्यामुळे राज्य सरकारने ई-चलान प्रणाली सुरू केली. ठाणे पोलिसांनी ही ई-चलान पद्धत २०१९ पासून शहरात राबविण्यात सुरूवात केली. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या सर्वच ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते. या कारवाईत वाहतूक पोलिस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाच्या वाहन क्रमांकाचे छायाचित्र मोबाईलद्वारे काढून त्याची ई-चलान प्रणालीत नोंद करतात. या प्रणाली द्वारे संबंधित वाहनचालकाच्या मोबाईलवर दंडाची रक्कमेची पावती पाठविण्यात येते.

आणखी वाचा-ठाणे शहर विद्युत रोषणाईने उजळले

दंडाची रक्कम केव्हाही भरण्याची मूभा असल्याने वाहन चालक दंडाच्या रकमेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे चालकाकडून पुन्हा वाहतुक नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडाच्या रकमेतही वाढ होत असते. काही दिवसांपूर्वीच ३० हजारहून अधिक थकित दंड असलेल्या रिक्षांचे वाहन क्रमांक पोलिसांनी फलकाद्वारे प्रदर्शित केले होते. ठाणे आयुक्तालयात ६ लाख १५ हजारहून अधिक वाहन चालकांवर ई-चलानाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ही रक्कम ५२ कोटीहून अधिक आहे. पाच कोटीची रक्कम चालकांनी भरली आहे. उर्वरित ४७ कोटी रुपयांचा दंड अद्यापही थकित आहे. अनेक वाहन चालक दंडाची रक्कम अधिक असल्याने दंड भरण्यास असमर्थता दाखवितात. अशा चालकांविरोधात खटला दाखल केला जातो. यातील अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीच्या माध्यमातून ही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतात.

आणखी वाचा- दिवा तलावाला प्रदुषणाचा विळखा

काही दिवसांपूर्वी लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायदंडाधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, दिवाणी न्यायाधीश, पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांची एक बैठक झाली. अशा खटल्यात तडजोड घडवून आणण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार ९ नोव्हेंबरपर्यंत ठाणे वाहतुक शाखेच्या तीन हात नाका कार्यालयात हे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. थकित दंड भरण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांना निवृत्त न्यायाधीश संध्या रायकर या मार्गदर्शन करतील. तसेच यावेळी पोलिसांकडून थकित दंडाच्या रकमेतही ४० ते ५० टक्क्यांची कपात केली जाणार आहे. ९ डिसेंबरला लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. या लोकअदालतीमध्ये हे दंड आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थकित दंड भरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यानंतर ही संधी मिळणार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे पोलिसांच्या तीन हात नाका येथील कार्यालयात सकाळी ११ ते सांयकाळी ४ वाजेपर्यंत मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी थकित दंडाची रक्कम कमी केली जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी दंडाची रक्कम भरावी. -डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.