डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवेशासाठी पूर्व भागात बाजीप्रभू चौक येथे स्कायवाॅकचा जिना आहे. या जिन्याच्या पायऱ्या तुटल्या आहेत. गर्दीच्या वेळेत घाईत असलेल्या प्रवाशांचे या जिन्याच्या तुटलेल्या पायऱ्यांवर पाय घसरून प्रवासी पडत आहेत. मोबाईलवर बोलत असताना जिन्यावरून उतरणारे प्रवासी पडण्याचे प्रमाण अधिक आहे, असे या भागातील विक्रेत्यांनी सांगितले.

डोंंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौक सर्वाधिक वर्दळीचा थांबा आहे. याठिकाणी केडीएमटीचा बस थांबा, विविध कंंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बस, रिक्षा वाहनतळ आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात जाणारे प्रवासी या चौकात अधिक संख्येने येतात. गेल्या मागील काही महिन्यांपासून सततच्या वर्दळीमुळे स्कायवाॅकच्या जिन्याच्या पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. या जिन्याच्या पायऱ्या दुरुस्त करण्याची जबाबदारी कल्याण डोंबिवली पालिकेची आहे. या तुटलेल्या पायऱ्यांविषयी अनेक नागरिकांनी पालिकेत तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

बाजीप्रभू चौकात उतरल्यानंतर अनेक प्रवासी घाईने लोकल पकडण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जातात. या प्रवाशांच्या जिन्यावरील तुटलेल्या पायऱ्या निदर्शनास आल्या नाहीतर तो पाय घसरून पडतो. नवखा प्रवासी याठिकाणी हमखास पडतो या भागात व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी सांगितले.

जिन्याच्या फरशांवरील लोखंडी पट्ट्या तुटल्या आहेत. त्यामुळे उतरणाऱ्या प्रवाशाच्या पायातील बुट, चपलेचे टोक या तुटलेल्या लोखंंडी पट्टीत अडकून प्रवासी थेट त्याच्या पाठीवरील पिशवीसह जमिनीवर झेपावून पडतो. अनेक प्रवासी मोबाईलवर बोलत जिना उतरत असतात. त्यांना या तुटलेल्या पायऱ्यांचा सर्वाधिक फटका बसतो. सुरुवातीला जिन्याच्या फरशांवरील लोखंडी पट्ट्या सैल झाल्या होत्या. या सैल पट्ट्या सतत पायाखाली येत असल्याने आणि प्रवासी पडण्याचे प्रमाण वाढू लागल्याने काही जागरूक नागरिकांनी जिन्यावरील अपघाती सैल पट्ट्या तोडून टाकल्या. काही पट्ट्या वाक देऊन तेथेच एका बाजुला करून ठेवल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांना याठिकाणी जिन्याच्या बाजुच्या खांबांचा आधार घेऊन चढ उतार करावी लागते. या जिन्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पालिका बांधकाम विभागाने या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालण्याची मागणी प्रवासी करत आहेत. अनेक रिक्षा चालकांनी या जिन्याच्या तुटलेल्या लोखंडी पट्ट्यांविषयी पालिकेत कळविले आहे. आम्हाला बघतो, करतो अशीच उत्तरे पालिकेतून दिली जातात, असे रिक्षा चालकांनी सांगितले. या जिन्याच्या अवतीभवती फेरीवाले बसलेले असतात. तेथून मार्ग काढत जिन्यावर जाताना तुटलेल्या पायऱ्यांच्या अडथळ्यांन सामोरे जावे लागते, असे प्रवाशांनी सांगितले.