डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगरमधील सर्वाधिक वर्दळीच्या निर्माणाधीन सीमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधणीचे काम गेल्या पंचविस दिवसांपासून रखडले आहे. या रखडलेल्या रस्त्यामुळे महाराष्ट्रनगर परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना वाहनाने वळसा घेऊन किंवा रखडलेल्या रस्त्यावरून जोखीम घेऊन प्रवास करावा लागतो. नागरिक याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे महापालिकेच्या विकास आराखड्यातील हा रस्ता आहे. या रस्त्याचे रूंदीकरण न करताच उपलब्ध दहा फुटाच्या रस्त्यावर ठेकेदाराने सीमेंट काँक्रिटीकरण करून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. निविदेतील अटीशर्तीप्रमाणे पालिकेच्या ह प्रभाग क्षेत्राच्या साहाय्यक आयुक्तांनी रस्त्याचे रुंदीकरण करून दिल्यानंतर एमएमआरडीएच्या ठेकेदाराने तेथे सीमेंट रस्ता बांधणी करायची आहे. महाराष्ट्रनगरमधील दूरसंचार केंद्र कार्यालय, दयानंद किरतकर यांचे जनसंपर्क कार्यालय ते साई गणेश मित्र मंडळ, योगसंकुल ते महाराष्ट्रनगर रिक्षा थांबा काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. या कामातील गणेश मोटार ट्रेनिंग शाळा ते शिवसेना शाखेजवळचा रस्ता, योगसंकुल रस्ता पूर्ण करण्यात आला आहे.
श्री साई गणेश मित्र मंडळ ते महाराष्ट्रनगर रिक्षा थांबा हा रस्ता विकास आराखड्यातील रस्त्याच्या रूंदीप्रमाणे न करता उपलब्ध आठ ते दहा फुटाच्या रस्त्यावर काँक्रीटचा बांधण्यात आला आहे. श्री साई गणेश मित्र मंडळ येथे काँक्रीटचा रस्ता बांधून पूर्ण झाला आहे. याठिकाणी रस्ता दीड फूट उंच झाला आहे. या रस्त्याचा पुढील भाग ठेकेदाराने हाती घेतला नाही. या दीड फूट उंचीच्या रखडलेल्या रस्त्यामुळे रिक्षा, मोटारी, दुचाकी स्वारांना याठिकाणाहून जाता येत नाही. याठिकाणी रस्त्याच्या उंचीमुळे खड्डा तयार झाला आहे. मुसळधार पावसामुळे याठिकाणी पाणी तुंबते.
महाराष्ट्रनगरमध्ये खराब रस्ता, रस्त्याच्या उंचवट्यामुळे रिक्षा चालक येण्यास तयार होत नाहीत. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या आणि रात्रीच्या वेळेत कामावरून परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रात्रीच्या वेळेत प्रवासी महाराष्ट्रनगरचे भाडे घेण्यास नकारत देत आहेत. शाळांची विद्यार्थी वाहू वाहने या मार्गावर येण्यास अडथळा आहे. पालकांना वळण घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत न्यावे लागते.
डोंबिवली रेल्वे स्थानक ते महाराष्ट्रनगर दरम्यान रिक्षा चालकाने प्रवासी भाडे घेतले तरी तो प्रवाशांना उंचवट्या खराब रस्त्यामुळे श्री साई गणेश मित्र मंडळ येथे उतरवतो. प्रवाशांना तेथून पुढे पायी प्रवास करावा लागतो. रस्ते कामे एमएमआरडीएचे ठेकेदार करत आहेत. पालिका अभियंत्यांना या कामाच्या ठिकाणी हस्तक्षेप करता येत नाही. एखाद्या पालिका अधिकाऱ्याने नियमाप्रमाणे ठेकेदाराला रस्ता करण्यास सांगितला तर त्या अधिकाऱ्याला तात्काळ राजकीय नेत्याचा फोन येतो. त्यामुळे अधिकारी याविषयी शांत राहणे पसंत करतात. या खराब रस्त्यामुळे रिक्षा चालकांना गरीबाचापाडामार्गे वळसा घेऊन प्रवासी वाहतूक करावी लागते. ठेकेदाराने महाराष्ट्रमधील रखडलेल्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात या भागातील रहिवासी आहेत.