लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : येथील माजिवाडा भागातील पुलावर शुक्रवारी रात्री कंटेनर बंद पडल्याने शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर कोंडी झाली. ४० टन वजन वाहू नेणारा हा कंटेनर बाजूला करणे शक्य होत नसून तो १३ ते १४ तासांपासून जागेवर उभा असल्याने ठाणेकरांची वाट अडली आहे. शनिवार सायंकाळपर्यंत कोंडी कायम असल्याने दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले.
आणखी वाचा-आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला बॅनर फाडणाऱ्यांच्या वाहनाचा क्रमांक जाहीर
ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवाडा उड्डाण पुलावर एक कंटेनर शुक्रवारी रात्री बंद पडला. मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गिकेवर हा कंटेनर बंद पडला आहे. अवजड कंटेनरवर ४० टन वजनाचे साहित्य आहे. स्थानिक वाहन दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना पाचरण करून कंटेनर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु त्यात यश येत नव्हते. अखेर शनिवारी दुपारी वाहन कंपनीच्या दुरुस्ती कारागिरांना पाचरण करण्यात आले आहे. तोपर्यंत १३ ते १४ तास कंटेनर जागेवरच उभा होता. या बंद कंटेनरमुळे वाहनांच्या पाठीमागे रांगा लागल्या होत्या. दुपारी १२ वाजेनंतर शहरात अवजड वाहतूक सुरू होताच कोंडीत वाढ झाली. आनंदनगर ते माजीवाडा मार्गावर कोंडी झाली होती. त्याचा परिणाम, घोडबंदर मार्गावर कोंडी झाली. माजिवाडा ते कापुरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना या कोंडीचा फटका बसला.