ठाणे – उद्योगधंद्यांमध्ये झालेली वाढ यामुळे ओघाने अधिक झालेले नागरिकीकरण आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे झालेली पायाभूत सुविधांची उभारणी यामुळे ठाणे जिल्ह्याच्या विकासाने गती घेतली आहे. जिल्ह्याच्या याच प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा सांख्यिकी अहवाल प्रकाशित झाला असून यानुसार ठाणे जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नांत २०२० ते २०२३ या कालावधीत ८५ हजार रुपयांची सकारात्मक वाढ झाली आहे. तर २०२२ – २३ या कालावधीत जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे ३ लाख ५३ हजार २९९ रुपये इतके आहे तर याच वेळी राज्याचे २ लाख ५२ हजार ३८९ इतके आहे.

ठाणे जिल्ह्यात ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात शहरी भाग आहे त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग देखील आहे. या दोन्ही भागांच्या विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात आहेत. बुलेट ट्रेन, मेट्रो तसेच अंतर्गत रस्त्यांचे जाळे, महाविद्यालय यांची उभारणी प्रगतीपथावर आहे. तर बहुतांश प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या सगळ्या पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीसमवेतच मोठ्या उद्योगांची नांदी आणि त्यामुळे रोजगार देखील निर्माण झाला आहे. तर मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती यामुळे अनेक नागरिकांनी ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांकडे आपला मोर्चा वळवला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या विकासाला देखील हातभार लागला आहे. याचे चित्र जिल्ह्याच्या विकास अहवालातून देखील समोर आले आहे.

दरडोई उत्पन्न म्हणजे एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील एकूण उत्पन्न त्या भागातील लोकसंख्येने भागून मिळणारे एका व्यक्तीचे सरासरी उत्पन्न होय. हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे मोजमाप आहे. दरडोई उत्पन्न जास्त असणे म्हणजे त्या भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांचे जीवनमान चांगले आहे आणि त्यांच्याकडे खर्च करण्याची क्षमता अधिक आहे, असे सूचित करते. एखाद्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले असेल, तर त्याचा अर्थ असा की त्या जिल्ह्यात आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रगती घडली आहे. उद्योगधंद्यांची वाढ, सेवा क्षेत्रातील विस्तार, कृषी उत्पन्नात सुधारणा, शिक्षण व कौशल्य विकास यामध्ये जिल्ह्याने यश मिळवले आहे. स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात मिळाल्या आहे. यामुळे लोकांचे वैयक्तिक उत्पन्न वाढले आहे आणि त्याचा थेट परिणाम दरडोई उत्पन्न वाढीवर झाला आहे.

स्थानिक प्रशासनाच्या प्रभावी योजना, पायाभूत सुविधांची उपलब्धता, गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण आणि नवीन उपक्रमांना मिळालेली चालना हे घटकही या वाढीला कारणीभूत ठरतात. अशा जिल्ह्यांत लोकांची क्रयशक्ती वाढते, बाजारपेठ सक्रीय होते आणि सामाजिक क्षेत्रांत जसे की शिक्षण, आरोग्य, घरे, वाहतूक सुधारणा दिसून येतात. दरडोई उत्पन्नात झालेली वाढ म्हणजे केवळ आर्थिक वृद्धी नव्हे, तर त्या भागातील लोकांच्या जीवनमानात झालेली उन्नती देखील समजली जाते. त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढणे ही त्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची पावती असते.

२०२०-२१ चे ठाणे जिल्ह्याचे सरासरी दरडोई वार्षिक उत्पन्न २ लाख ६८ हजार २९३ तर राज्याचे दरडोई उत्पन्न १ लाख ९३ हजार १२१ इतके होते.

२१ – २२ चे ठाणे जिल्ह्याचे २ लाख ९४ हजार ३६२ आणि याच वेळी राज्याचे २ लाख १५ हजार २३३ इतके होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२२ – २३ चे ठाणे जिल्ह्याचे ३ लाख ५३ हजार २९९ आणि याच वेळी राज्याचे २ लाख ५२ हजार ३८९ इतके आहे.