अंबरनाथ : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच झालेल्या पावसाने अंबरनाथ शहराच्या प्रमुख रस्त्यांवरचे डांबरी पट्टे उखडून टाकले आहेत. त्यामुळे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर आणि ज्या ज्या ठिकाणी डांबरी भाग आहेत, त्या त्या ठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे तातडीने याची दुरूस्ती करण्याची मागणी होते आहे.

अंबरनाथ शहरातून दोन महत्वाचे मार्ग जातात. काटई अंबरनाथ राज्यमार्ग आणि कल्याण बदलापूर राज्यमार्ग शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्वाचे मार्ग आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मार्गांवर विविध कारणांमुळे कोंडी होते आहे. कल्याण बदलापूर राज्यमार्ग शास्त्री हिंदी विद्यालयापासून असमान, लहान मोठ्या खड्ड्यांचा आणि मध्येच येणाऱ्या पेव्हर ब्लॉकच्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसाठ त्रासदायक बनतो. त्यामुळे विविध ठिकाणी कोंडी होत असते.

काटई अंबरनाथ रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते रूंदीकरण आणि कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग वेगवान वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. मात्र या रस्त्यावर सध्या खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक बनला आहे. अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर पूर्वेत काटई अंबरनाथ मार्गावर एचपी पेट्रोल पंपाशेजारी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मुळात या भागाच्या दोन्ही बाजूंना कॉंक्रिटचा रस्ता असताना अवघा ५० मिटरचा भाग कॉंक्रिटचा का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्याचवेळी याच मार्गावर पुढे पिंकसीटीकडे जाणाऱ्या फाट्याजवळ वळणावर अचानक कॉंक्रिटचा रस्ता संपूर्ण खड्डा लागतो. त्यामुळे वाहनचालकांची आणि विशेषतः दुचाकीस्वारांची तारांबळ उडते. रात्रीच्या अंधारात हा खड्डा दिसून येत नाही. अचानक येथे उतार लागल्याने आणि पुढे लगेच दुसरा खड्डा लागल्याने वाहनचालकांची वाहने या खड्ड्यात आपटतात. त्यामुळे वाहनांचे भाग नादुरूस्त होत आहेत.

पुढे टी जंक्शन चौकातही अशाच प्रकारे खड्डे पडले आहेत. येथेही डांबरी रस्ता आहे. त्यामुळे येथे फ़ॉरेस्ट नाक्याकडे जाणारी वाहने थांबतात. हळूहळू ही वाहने मार्गक्रमण करतात त्यामुळे येथेही कोंडी होते. येथे अनेकदा पथदिवेही बंद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्य पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथील खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोदकामामुळे बहुतांश भाग व्यापला

कल्याण बदलापूर राज्यमार्गावर विविध ठिकाणी विविध प्रकारची कामे सुरू आहेत. शास्त्री विद्यालयाच्या समोरच्या बाजुला, पुढे विमको नाका येथे वाहिन्या टाकण्यासाठी रस्त्याचा भाग खोदण्यात आला आहे. त्याचा राडारोडा रस्त्यावरच पडून आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.