ठाणे : मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणातून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली. यावर आता प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असतानाच, कॉँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यावर युवा युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी कॉँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. यामध्ये विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली. यावर आता प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असतानाच, कॉँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भगवा दहशतवाद हे म्हणू नका तर सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा असे विधान केले आहे. तसेच आरोपी निर्दोष सुटणे हे तपास यंत्रणेचं अपयश आहे, असेही चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले

मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना २००८ ची आहे. या घटनेला १७ वर्षे झाली आहे. बॉम्बस्फोट कुणीतरी केला आणि त्यात ८ लोकांचा मृत्यू झाला आणि १०० लोक जखमी झाले. मशिदीच्या शेजारी हा स्फोट झाला. मला एक टक्काही शक्यता वाटत नव्हती की वेगळा निकाल लागेल. हा निकाल असाच लागणार हे वाटत होते. तसाच निकाल लागला.

माझी हात जोडून विनंती आहे, भगवा दहशतवाद हा शब्द वापरु नका. भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा रंग आहे. तसेच तो वारकऱ्यांच्या झेंड्याचा रंगही भगवा आहे. त्यामुळे भगवा दहशतवाद असे कुणीही म्हणू नये. त्याऐवजी हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा किंवा सनातनी दहशतवाद म्हणा. भगव्या रंगाला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे काँग्रेसच्या लोकांनाही माझी विनंती आहे. भगवा दहशतवाद म्हणू नका. दहशतवादाला धर्म, रंग काहीही नसते. त्यामुळे त्याला कुठलाही रंग देऊ नका असे आवाहन मी करतो आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवा सेनेची टीका

सनातन धर्म हा आमचा अभिमान आहे. भगवा शिवरायांचा, आमच्या शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा आणि वारकऱ्यांचा स्वाभिमान आहे. सनातन धर्माला दहशतवाद म्हणणारे तुमच्यासारखे लोक मानसिक दिवाळखोर आहेत. स्वतःचे नाव बदलून महंमद घोरी ठेवा, हे नाव तुम्हाला शोभत नाही. तुमची राजकीय सुंता झाली असेल, पण आमचे रक्त भगवे आहे. उद्या युवासेना याला उत्तर देणार, शिवसेना स्टाईलने, थेट आणि ठणकावून, अशी प्रतिक्रिया युवा युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.