ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्याला जोडणाऱ्या भिवंडी-वाडा मार्गावर खड्ड्यांचे झालेले डबके, अपघात आणि वाहतुक कोंडी यामुळे येथील स्थानिक संतप्त झाले आहेत. भिवंडी वाडा मार्गावर भिवंडीतील वंजारपट्टी ते अंबाडी हे अंतर पार करण्यासाठी किमान एक तास लागत होता. आता या मार्गावर तीन ते चार तास वाया जात आहेत. विद्यार्थी देखील कोंडीमुळे त्रस्त झाले असून कोंडीमुळे वेळेत शाळेत पोहचत नाही. तर काहीजण शाळेत जाणे टाळत आहे. कामानिमित्ताने नोकरदारांचेही हाल होत आहेत. खड्ड्यांमुळे येत्या गुरुवारी येथील श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये मोठ्याप्रमाणात गोदामे आहेत. उरण येथील जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने भिवंडी-वाडा मार्गे पालघर किंवा त्या मार्गालगतच्या गोदामात जातात. भिवंडी-वाडा मार्गालगत काही गावे देखील आहेत. या गावातील रहिवाशांना मुख्य भिवंडी शहरात किंवा ठाणे, पालघरला जाण्यासाठी हाच मार्ग महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्याच्या स्थितीविषयी प्रश्न उपस्थित होतात. परंतु पावसाळा संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे-थे होते. यावर्षी या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांचा आकार डबक्याच्या आकारा इतका झाला आहे. खड्ड्यांमुळे मार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागतात.

अवजड वाहनांचा भार वाढल्याने दररोज वाहतुक कोंडीचा त्रास येथील स्थानिकांना सहन करावा लागत आहे. वाहतुक कोंडीमुळे नोकरदार, कामानिमित्ताने बाहेर पडणारे नागरिक वेळेत पोहचत नाही. वंजारपट्टी ते अंबाडी हे अवघ्या एक तासाचे अंतर गाठण्यासाठी वाहन चालकांचे तीन ते चार तास वाया जातात. शाळेतील विद्यार्थी शाळेत वेळेत पोहचत नसल्याने किंवा कोंडीमुळे शाळेत जाणे टाळत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे.

श्रमजीवी आक्रमक

भिवंडी-वाडा रस्त्याच्या स्थितीविषयी श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी (२६जून) संघटनेने बेमुदत रस्ता रोकोचा इशारा दिला आहे. वाडा येथील खंडेश्वरी नाका, शिरीष फाटा, कुडूस आणि डाकिवली, भिवंडी येथील अंबाडी, नांदीठणे फाटा, कवाड नाका, मालोडी आणि वसई येथील चिंचोटी, कामण मार्गावर हे आंदोलन होणार आहे.

या रस्त्याच्या निर्माणाला, दुरुस्तीला राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. मात्र ठेकेदारांच्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांना खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या प्रश्नावर श्रमजीवी संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि बोगस कामांचे आरोप विधिमंडळात झाले त्या ठेकेदार कंपन्यांना तातडीने काळ्या यादीत टाकून या पूर्ण भ्रष्टाचाराची निःपक्ष चौकशी करावी. ठेकेदाराला कुणीही राजाश्रय देऊ नये. – प्रमोद पवार, प्रवक्ते, श्रमजीवी संघटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाडा येथे न्यायालयीन कामकाजासाठी निघालो होतो. एक तासात तेथे पोहचणे अपेक्षित होते. परंतु वाहतुक कोंडी आणि खड्ड्यांमुळे हा प्रवास तीन तासाहून अधिकचा झाला असे अंबाडी येथील एका वकिलाने सांगितले.