लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : देशातील ५१ शक्तीपीठांपैकी आणि राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ म्हणून तुळजापुरचे तुळजाभवानी मंदीर ओळखले जात असून या शक्तीपीठाचे एक रुप ठाण्यात साकारण्यात येत आहे. ठाण्यातील पाचपाखाडी भागात प्रति तुळजापुर मंदीराची उभारणी करण्यात येत आहे. या मंदीराचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याची चित्रफित राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली असून त्यात येत्या ३० एप्रिलला मंदीरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे म्हटले आहे.

ठाण्याच्या पाचपखाडी भागातील गणेशवाडी येथे तुळजाभवानीचे मंदिर आहे. या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान मुंबई- ठाण्यातील अनेक भाविक येतात. २५ ते ३० वर्षांपुर्वी हे मंदिर येथील नागरिकांनी उभाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कालांतराने या मंदिराचे काम रखडसले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. मंदिरात २ आणि ३ मार्च २००४ रोजी मुर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. परंतु २५ ते ३० वर्षे जुने असलेले हे मंदीराचे बांधकाम जीर्ण झाले होते. रस्त्याकडेलाच हे मंदीर असल्यामुळे वाहतुक कोंडीही होत होती. त्यामुळे भविष्यातील वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी या मंदिराची नव्याने उभारणी करण्याचा निर्णय घेतला.

नवीन मंदिरासाठी शेजारीच असलेल्या उद्यानातील जागा ठाणे महापालिकेकडून मिळविण्यात आली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन मंदिराचा आराखडा मंजूर करुन घेण्यात आला. शासकीय परवानग्या आणि इतर बाबींची पूर्तता करुन हे मंदिर उभारण्यात येत आहे. जागेचे माती परिक्षण केल्यानंतर मंदिर उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपुजन अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले. मंत्रोच्चार, देवतांचे अवाहन, होम-हवन आदी सर्व विधींची पूर्तता करुन हा भूमिपुजन सोहळा पार पडला होता.

काळ्या पाषाणात मंदिराची उभारणी

काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर साकारले जावे आणि या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा, अशी मनस्वी इच्छा जितेंद्र आव्हाड यांची होती. त्यामुळे काळ्या पाषाणात हे मंदिर उभारण्यात येत आहे. थेट तमीळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा शिव शंकराचे स्थान असलेल्या कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या. असेंड क्रियेटीव्हचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली. शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारुन ठाण्यात आणण्यात आले. काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला. अन् प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे आहे मंदीर

सुमारे दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर करुन ३३ फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कलश, २६ स्तंभ, २० गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे हे मंदिर आता साकारले आहे. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुन:र्जिवित करीत हे मंदिर साकारले आहे. पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता, हे मंदिर उभे केले आहे, अशी माहिती वास्तुविशारद संजय बोबडे यांनी दिली.