डोंबिवली : कडक उन्हाळा सुरू झाल्यापासून डोंबिवली शहराच्या विविध भागात अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा दोन ते तीन चार तास वीज पुरवठा पूर्ववत होत नसल्याने नागरिकांची हैराण होत आहे. हे अघोषित वीज भारनियमन तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाच्या उपस्थितीत केली. कडक उन्हाळ्यामुळे अनेक आजार, साथरोग निर्माण झाले आहेत. घरात ज्येष्ठ, वृध्द, लहान बाळे असतात. आजारी रुग्ण असतात. त्यांना घरात वीज पुरवठा नसेल तर सर्वाधिक त्रास होतो. या बाबींचा विचार करुन कोणत्याही परिस्थितीत येत्या दोन महिन्याच्या कालावधीत डोंबिवली परिसरात अघोषित भारनियमन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख थरवळ यांनी अधिकाऱ्यांना केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीत गोग्रासवाडीसह शहराच्या विविध भागात टोलेजंग बेकायदा इमारती भूमाफियांनी उभ्या केल्या आहेत. या इमारतींमध्ये काही ठिकाणी १०० हून अधिक कुटुंब वास्तव्याला आली आहेत. या बेकायदा इमारतींना भूमाफियांच्या दबावामुळे महावितरणकडून स्वतंत्र रोहित्र न बसविता लगतच्या इमारतीला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रावरुन वीज पुरवठा केला जातो. ज्या रोहित्राची क्षमता १०० ते २०० कुटुंबांना वीज पुरवठा करण्याची आहे. त्या रोहित्रावर जर बेकायदा इमारतीमधील २०० हून अधिक कुटुंबांचा वीज वापराचा भार आला तर त्या भागात सतत वीज पुरवठा खंडित होतो. असे प्रकार डोंबिवली शहराच्या अनेक भागात सुरू आहेत. बेकायदा इमारतींना महावितरण अधिकारी स्थानिकांना अंधारात ठेऊन अस्तित्वात रोहित्रावरुन वीज पुरवठा देतात. अशा इमारतींना वीजपुरवठा अधिकाऱ्यांना द्यायचा असेल तर त्यांनी त्यासाठी त्यांच्यासाठी स्वतंत्र रोहित्राची व्यवस्था करावी. नियमित कर भरणा करणाऱ्या रहिवाशांना या वाढीव वीज भाराचा त्रास देऊ नये, अशी मागणी थरवळ यांनी केली.

हेही वाचा… खारघरहून परतलेल्याला मुरबाडच्या श्रीसेवकाचा मृत्यू; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांकडून दावा

डोंबिवलीत १०० टक्के वीज देयक भरणा होतो. त्यामुळे नियमित देयक भरणा करणाऱ्या रहिवाशांना अघोषित भारनियमनाचा त्रास देऊ नये. आणि बेकायदा इमारतींच्या वीज पुरवठ्यामुळे नियमित वीज देयक भरणा करणाऱ्या रहिवाशाला त्रास होणरा नाही याची काळजी घ्यावी, असे थरवळ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

हेही वाचा… ठाण्यातील खाडीवर राडारोड्याचा भराव, मोठ्या प्रमाणात खारफुटी नष्ट होऊनही शासकीय यंत्रणाचे दुर्लक्ष

केलेल्या सूचनांची गंभीर दखल घेत शहराच्या विविध भागात वीज पुरवठा खंडित होत असेल तर तो सुरळीत राहील याची काळजी घेतली जाईल. यासाठी येत्या १५ दिवसाच्या प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अधीक्षक पाटील यांनी जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ यांना दिले. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय बिक्कड, शिवसेनेचे शहरप्रमुख विवेक खामकर, तात्यासाहेब माने, अरविंद बिरमोळे, वैशाली दरेकर, किशोर मानकामे, अभिजीत थरवळ, सुधाकर वायकोळे, अभय घाडिगावकर, प्रशांत कांबळे उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena demands to stop undeclared load shedding in dombivli asj
First published on: 26-04-2023 at 18:25 IST