लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोमवारी सिंधी समाजातर्फे कोपरी बंद पुकारण्यात आला होता. तसेच, सिंधी समाजासह कोपरीतील लोकप्रतिनिधींनी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेउन पोलिसांना निवेदन दिले. या निवेदनात आव्हाडांची ब्रेन मॅपिंग चाचणी तसेच नार्को चाचणी करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्हासनगर कॅम्प पाच येथील नेताजी चौकात उल्हासनगर राष्ट्रवादीच्या वतीने २७ मे रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर उल्हासनगर तसेच ठाण्यातील सिंधी बांधव आक्रमक झाले आहेत. कोपरीतील सिंधी समाजाने दोनच दिवसांपूर्वी निषेध सभा घेऊन कोपरी बंदची हाक दिली होती. त्यानुसार, सोमवारी संपूर्ण कोपरी बाजारात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच कोपरीतील बाजारपेठ बंद होती. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. सिंधी समाजातील काही नेत्यांनी तसेच कोपरीतील भाजपच्या माजी नगरसेवकांनी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना निवेदन दिले. तसेच आव्हाड यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली.